Summary of the Book
मानव ही निसर्गाची सर्वश्रेष्ठ कलाकृती आहे. शास्त्रज्ञ, अनेक तत्ववेत्ते, साधुसंत, शेकडो वर्षांपासून मानवी जीवनाचा, आरोग्याचा अभ्यास करत आले आहेत. औषधनिर्मितीमध्ये विसाव्या शतकापासून मानवानं लक्षणीय प्रगती केली आहे. या प्रगतीमुळे सर्वसामान्य आरोग्य सुधारले, आजार कमी झाले. संसर्गजन्य आजार जवळजवळ नाहीसेच झाले. आयुष्यमान वाढलं. जीवनमान उंचावलं. अन्नधान्याची रेलचेल झाली. पण अति आणि अयोग्य खाण्यानं, कमी श्रमामुळं आंतरिक प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे नवीन आजार बळावले. आधुनिक युगातील ताणतणाव, धकाधकीचे जीवन यामुळे या आजारांना गंभीर वळण लागत आहे. त्याचबरोबर मनोजन्य आजार उदा. अर्धशिशी, ऍसिडिटी पेप्टिक अल्सर, सोरिऍसीस, लायकेन हे आजारही वाढले आहेत.
डॉक्टरांची भरमसाठ फी परवडत नसतानाही हजारो रुपये औषधांसाठी खर्च केले जातात. आणि तरीही रोगमुक्ती मिळत नाही ती नाहीच.
या पुस्तकात मधुमेह, अतिरक्तदाब, स्थूलत्व, पाठदुखी, सांधेदुखी, हृदयविकार अशा आजारांबाबत आपण औषधाशिवाय काय करू शकतो याचे सोपे मार्गदर्शन आहे. सुयोग्य, समतोल, सुनियंत्रित, नियमित आहार कसा असावा, तणावमुक्तीसाठीचे विशेष प्रयत्न कसे करावे, व्यायाम कसा व किती करावा, त्याचे असाधारण महत्व अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींबाबत साध्या सोप्या भाषेत मार्गदर्शन केले आहे. स्वत:च्या उत्तम आरोग्यासाठी हे पुस्तक सतत हाताशी असावे असे नक्कीच आहे.