Summary of the Book
लेखक म्हणून व्यंकटेश माडगूळकर यांची भूमिका एवढी व्यापक आहे कि मनुष्य, प्राणी व वनस्पती सृष्टी यांचा ते एकाच वेळी व एकमेकांच्या संदर्भात अत्यंत स्वाभाविकपणे विचार करतात. त्यांच्या निरीक्षणाचा, वाचनाचा व चिंतनाचा तो एक कायम जिव्हाळ्याचा विषय असतो.
माडगूळकर देशविदेश हिंडलेले असोत, वा आधुनिक सुसज्ज शहरी निवासात राहत असोत, त्यांच्या बोलण्याच्या शैलीत ग्रामीण भाषेची व उच्चारांची लोभस वाटणारी वैशिष्ट्ये टिकून आहेत, हि बाब मला आनंददायक वाटते.माडगूळकरांची वाड्मयीन कामगिरी दोन दृष्टींनी महत्वाची आहे.एक तर त्यांनी श्रेष्ठ वाड्मयकृती निर्माण करून मराठी वाड्मय समृद्ध केले.दुसरे म्हणजे आशयाच्या व भाषेच्या बाबतीत मराठी वाड्मयाला चांगल्या अंगाने वळण लावण्याचे ऐतिहासिक कार्यही केले आहे. ते स्वतः ग्रामीण जीवन समरसून आणि उत्कटतेने जगले आहेत.त्यांना ग्रामीण जीवनाचा गाभा साक्षात कळला आहे, याचा प्रत्यय त्यांची कोणतीही छोटी मोठी वाड्मयीन कलाकृती वाचली तरी येतो! एकंदरीत मराठी साहित्यात ग्रामीण व दलित जीवनाचे चित्रण करण्याचे आद्यत्व माडगूळकरांकडेच जाते. त्यांच्या साहित्याला भारतात व भारताबाहेरील अन्य जगात मान्यता मिळाली, त्याचे कारण त्यांच्या देशीपणात आहे. माडगूळकर चित्रकारही आहेत.
कदाचित त्याचा परिणाम म्हणून असेल, शब्दांतून साक्षात चित्र उभे करण्याचे त्यांचे सामर्थ्य अपूर्व आहे. भाषा या द्रव्याचे महत्व तुकारामांसारखेच त्यांना भावलेले आहे. त्यांचासारखे उत्तम गद्य लिहणारे लेखक दुर्मिळ!