Summary of the Book
‘‘आपल्या देशातून गोरे इंग्रज तर गेले म्हणतात. पण कैदखान्यात डांबून ठेवलेल्या आपल्या पारधी लोकांना का सोडत नाहीत? आपण तर जमीनदार देशमुखांपेक्षाही गोर्या इंग्रजांच्या विरोधात खूप मोठा लढा दिला. त्या गोऱ्यांना सळो की पळो करून जंगलातून आपण पिटाळून लावायचो. म्हणून गोर्या इंग्रजांनी आपल्यावरती डाव उधळला. जंगलात राहणार्या सर्व आदिवासी पारध्यांना बायका-लेकरांसहीत बंदी करून रेल्वेच्या अन् झाडं कापण्याच्या कामाला लावलं, गुराढोरांसारखं आपल्याला बदडून काढलं.’’
‘‘बाजीराव देशमुखांना आणि त्यांच्या जनतेला स्वातंत्र्य मिळालं म्हणतात. आता सर्व सरकार त्यांच्या हातात आलं असं म्हणतात. मग आम्हाला अजून स्वातंत्र्य का मिळत नाही ? ...आमच्या जंगलात राहणार्या आदिवासी पारध्यांना गोर्या इंग्रजांनी कैद केलं होतं. आता ते गेल्यानंतरही आम्हांला का सोडत नाहीत? ...
नाना पाटलांना इंग्रजांच्या विरोधात लढा दिला म्हणून वाजतगाजत स्वातंत्र्यसैनिक म्हणून जेलच्या बाहेर सोडून दिलं आणि माझ्या भावाला, काळविट्याला, मात्र चोर गुन्हेगारीचा कायदा लावून जेलमध्ये ठेवलं. दोघेही गोर्या इंग्रजांच्या विरोधात लढत होते. नाना पाटलांना मात्र स्वातंत्र्यसैनिक म्हणून मानसन्मान मिळाला- आता ता तिकडला मोठा मंत्री आहे आणि माझा भाऊ काळविट्या मात्र जातीच्या नावाखाली चोर गुन्हेगारीच्या शिक्षा भागत जेलमध्ये पडला आहे. आपल्या भारत देशाला कसलं स्वातंत्र्य मिळालं आहे, हे माझ्या अजूनही लक्षात येत नाही. देश स्वतंत्र झाला असं म्हणतात, पण अजून माझ्या बायको-मुलांचा शोधही नीट लागत नाही. ते कुठे आहेत याचा पत्ताही लागत नाही. आपल्या पारधी आदिवासींना सोडायचं तर आणखी खूपच दूर आहे.’’