Summary of the Book
तुकारामाची गाथा जशी पाण्यात न बुडता तरंगत राहिली तसेच गदिमांनी लिहिलेले शब्द हे काळाच्या ओघात विरून न जाता प्रत्येक जणांच्या मनात अजूनही तरंगत आहेत. पूरिया, जोगिया यांसारखे काव्यसंग्रह असोत किंवा 'या चिमण्यांनो' 'माझा होशिलं का?' ' जिंकू किंवा मारू' यांसारखे गीतप्रकार असोत. गदिमांचे शब्द हे प्रत्येकांच्या मनाशी अगदी अलगदपणे संवाद साधतात. त्यांच्या प्रत्येक गाण्यातून माणसांची जाणीव, संवेदना, वय याचाही प्रत्यय येतो आणि म्हणूंच की काय गीतरामायणाशिवाय कोणत्याही घरात रामजन्म साजरा होतचं नाही.
" नाच रे मोरा " ह्या पुस्तकाद्वारे गदिमांच्या ५० वर्षांतील लिहिलेल्या विविध गीतप्रकारांचा खजिनाच जणू आपल्याला भेट म्हणून "सौ. शीतल श्रीधर माडगूळकर" आणि " लीनता आलोक आंबेकर" ह्यांनी दिला आहे. यात 'चंदाराणी' 'शेपटीवाल्या प्राण्यांची' 'एक कोल्हा बहु भुकेला' चांदोबा चांदोबा भागलास का?' यांसारखी बालगीते किंवा 'जिंकू किंवा मरू' 'वंद्य वंदे मातरम्' सारखी स्फूर्तीगीते, तसेच 'निज माझ्या पाडसा' 'निज छकुल्या' यांसारखी अंगाई गीते आकर्षक चित्रांसहित भेट म्हणून दिली आहेत. बालपणाच्या आठवणी जागवणारा आणि छोट्यांना त्यांचा बालपणीचा काळ सुखाचा करून तो चिरकाल लक्षात राहील असा हा गीतसंग्रह लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना नक्कीच आवडेल.