Summary of the Book
महिलांचे विश्व पूर्वी सीमित होते. चाकोरीबद्ध जीवन जगताना त्यातील काही महिला स्वतंत्र वाट धुंडाळतात. रेखा बैजल यांच्या 'स्पंदन ' या कथासंग्रहातील स्त्रीची वेगळी रूपे पाहायला मिळतात.
योगीपुरुषाने केलेले भाकीत खोटे ठरावे, यासाठी घरदार सोडून तो रानोमाळ फिरत बसला तरी तेथेच ती घटना घडते अन भविष्यवाणी कशी खरी ठरते, हे 'भाकीत'मध्ये आले आहे. अहंकाराच्या आवरणाखाली गावातील तरुणांना सर्व विद्यांत पारंगत करणाऱ्या ऋषींना युद्ध छेडल्यावर आपण काय चूक केली हे कळते.
विनाशाच्या गर्तेत सापडल्यानंतर गावातील स्त्रिया त्यांच्या मुलांना युध्दकलेपासून दूर ठेवतात; पण त्यांचे प्रयत्न सळसळणाऱ्या तारुण्यापुढे तोकडे पडतात आणि इतिहासाची पुनरावृत्ती 'कोरी पानं' मधून होते. पैशाच्या लोभापायी दुसऱ्या देशाकडून स्वतःच्या देशाविरुद्ध लढणाऱ्या सैनिकाला 'ईमान'मधील म्हातारीने कसा धडा शिकवला हे वाचायला मिळते.
'पाऊलखुणा'मध्ये वाळवंटातील तांड्याबरोबर चालताना नाजूक पत्नीला नाईलाजाने मागे ठेवून जाणाऱ्या, तिच्यासाठी खुणा सोडणाऱ्या पतीची आणि त्या खुणांवरून पतीला गाठणाऱ्या; पण त्याच्या कलेवराशी भेट झाल्यानंतर प्राण सोडणाऱ्या पत्नीची कथा वाचायला मिळते. अशा एकूण १६ कथा यात आहेत.