Summary of the Book
मृणाल जोशी यांनी लिहिलेले हे पुस्तक सोळाव्या शतकापासून ते दोन हजारपर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींची नोंद घेते. चार शतकांमध्ये प्रत्येक दिवशी काहींना काही महत्त्वाची घटना घडलेली आहे, त्याची नोंद या पुस्तकात घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. हे पुस्तक म्हणजे केवळ प्रसिद्ध व्यक्तींच्या जन्म व मृत्यूची नोंद नसून अनेक ऐतिहासिक घटनांची दखल घेणारे पुस्तक आहे. मराठे व इंग्रज यांच्यात पहिले नाविक युद्ध 1679 मध्ये 19 सप्टेंबरला झाले; तर त्याच दिवशी 1917 ला दादासाहेब फाळके यांचा "लंकादहन' हा चित्रपट प्रदर्शित झाला, त्याच दिवशी 1931 ला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या "सन्यस्त खड्ग' या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत झाला, ही माहितीदेखील मिळते.
सामाजिक, राजकीय आणि धार्मिक तसेच सांस्कृतिकदृष्ट्या अनेक घटनांची नोंद या पुस्तकात करण्यात आली आहे. प्रत्येक दिवसाच्या नोंदीची सुरवात करताना एक सुभाषित देऊन त्याचा अर्थ देण्यात आला आहे. त्याचबरोबर वेगवेगळे दिन साजरे केले जातात त्याचीही नोंद घेण्यात आली आहे.