Summary of the Book
आजची मराठी कादंबरी अनेकस्तरीय जीवनानुभवामुळे समृद्ध आहे. समाजजीवनातील अनेकस्तरीय वाट, उपवाटांचे कथन तीमधून ध्वनित होत आहे. 'फेसाटी' या कादंबरीत पशुपालक, अल्पभूधारक शेतीसमूहातील तरुणाच्या संघर्षाची कथा साकारली आहे. नाथा गोरे या तरुणाच्या महाविद्यालयीन काळापर्यंतचा जीवनप्रवास या कादंबरीतून सांगितला आहे. हि जीवनकथा केवळ नकोशा शिक्षणव्यवस्थेपुरती सीमित नाही; तर त्यास अनेक कंगोरे आहेत. 'स्व' च्या शिक्षणप्रवासाबरोबरच कुटुंब आणि समाजातल्या अनेक महापेचांना ती साकार करते. दारिद्रयाचा शाप भली ल्यालेल्या आणि कर्जाच्या निरंतर सावटाखाली जखडलेल्या समाजाचे चित्र या जीवनकथेत समांतरपणे वाहते ठेवले आहे. गतविस्मृत ताईच्या गोठवलेल्या अपराधभावाच्या बोचणीतून या जीवनानुभावाला विवेकाचा स्वर प्राप्त झाला आहे. खेड्यातील व्यक्ती-समूहाची व्याधिकथा म्हणूनही तिला असाधारण महत्व आहे.
हा समाजपट सुंबरानच्या अख्यानरुपात गुंफला आहे. अतिशय ओघवत्या प्रवाही गद्याचे नितांत सुंदर परिमाण या गद्यकथेस आहे. गोष्टीवेल्हाळ आत्मपरता आणि वैशिष्ट्यपूर्ण संवाद व 'जत' परिसर बोलीची सहजता या कथनास आहे. 'जातु माझ्या मागाला, जातु माझ्या गावाला', 'सांगतु म्या जनाला', या दृष्टीने हि कथा सांगितली आहे. सगळीकडच वडं तुडुंब भरून वाहणारा भरघोस कथनऐवज तीमध्ये आहे. 'जवारी गई', 'शिंगरी', 'करंड', 'जुंधळं', 'येलतार' अशा अगणित शब्दरूपांनी या कथनाला सजीव बनविले आहे. अल्पाक्षरी शब्दबंधानी सजविलेले हे गद्य आहे. व्यक्ती, समाज, भू-जैविक वैशिष्टे आणि वर्तमान पेच साकारणारे नाथासुंबरानख्यान वैशिष्ट्यपूर्ण ठरेल.