Summary of the Book
अन्न हा प्रत्येक प्राणिमात्राचा जगण्याचा आणि आपापसातील सहबंधाचा एक दुवा राहिला आहे. जंगलातील आपोआप मिळणारे अन्न हा एक मोठा भाग. इथले जंगल हे एक 'फूड फॉरेस्ट' आहे. अन्नसुरक्षेबरोबरच पोषणसुरक्षा, पर्यावरणीय सुरक्षा व इथल्या मूळ रहिवाश्यांना उपजीविकेची सुरक्षा देणारे हे जंगलातून मिळणारे अन्न. यात कंदमूळापासून ते अळंबीपर्यंत, काटेरी निवडुंगापासून ते मोठाल्या वृक्षराजीपर्यंत, बोटभर वाढणाऱ्या झुदुपापासून ते लांब वाढणाऱ्या वेलीपर्यंतचा समावेश होतो.
या आपल्या आदिम अन्नाच्या शोधात प्रवासात मी कधी रानात फिरले तर कधी वनांत.त्या-त्या ऋतूत, ठराविक कालावधीत त्या विशिष्ट ठिकाणी जाऊन रानभाज्या शोधव्या लागत. हा 'शोधाचा प्रवास'खूप रोमांचक आणि माहितीपूर्ण असे. या प्रवासात मला अनेकदा इथल्या ऋतूंनुसार बदल्यात निसर्गाला अनुभवता आले. यातूनच निसर्गाच्या अद्भूत चक्राची आणि त्यास अनुरूप आपले जीवन व्यतीत करणाऱ्या इथल्या आदिवासींच्या संस्कृतीची जाणीव होत गेली.
उपलब्ध झालेली भाजी एकदा तरी स्वतः खाऊन पहायची, असा माझा आग्रह असे. त्यांच्या अनोख्या चवी अनुभवताना, शिजवण्याच्या पद्धती समजून घेताना, माझ्या जिभेचे चोचले मात्र पूर्ण होत होते. यात अनेक पालेभाज्या, फुलभाज्या, फळभाज्या यांचा समावेश होता. चवींची तर तऱ्हाच न्यारी असायची (कडू-गोड कसे मानायचे,हेही समजले). या सर्व शोधाच्या प्रवासाचे एक सचित्र व रोमांचक दस्तावेज म्हणजे हे पुस्तक.