Summary of the Book
निसर्गरम्य काश्मिरचा सुंदर मानवी चेहरा ओरबाडून विद्रूप करण्यात तिथले दहशतवादी, त्यांचा बीमोड करण्यासाठी तैनात केलेले लष्कर, स्थानिक धर्मांध लोक, केंद्र आणि राज्यसरकारचे राजकीय नेते, त्यांचे स्वार्थाने बरबटलेले राजकारण या सर्वांचा मोठाच हात आहे. दहशतवादाच्या काळात तिथल्या स्त्रियांचे सर्वांकडून होणारे लैंगिक शोषण तर इतके भयावह आहे की त्या अत्याचाराच्या कहाण्या नुसत्या ऐकल्या, तरी अंगावर भीतीने काटा उभा राहतो. बाई हिंदू असो की मुसलमान, बलात्कार करताना ती फक्त बळी गेलेली स्त्री असते. जात, धर्म, वंश, देश, वय या सगळ्या गोष्टी तिथे गौण असतात. दहशतवाद्यांमुळे भारताचे नंदनवन पेटलेले आहे, धगधगत आहे. ही आग कशी आणि कोणी का लावली हे विचारायला त्यांना भेटले. केशराच्या मळ्यांमधे पेटलेले निखारे मला पाहवले नाहीत. अत्याचार पीडित स्त्रियांचे अनुभव ऐकवले नाहीत. काश्मिरी मुस्लीम मंडळींचे आयुष्य थोडेसे जवळून पाहता आले. त्यातून त्यांचे जीवन, विचारसरणी, राहणी याचा माझ्या कुवतीनुसार केलेला विचार आहे. 1958 सालचे काश्मिर, 1997 सालचे जम्मू, 2005 चे श्रीनगर आणि आता 2007 साली कुटुंबातच राहून पाहिलेले काश्मिर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून दिसले. तेच हे लिखाण मोहतरम्मा ते अम्मा !