Summary of the Book
`महाराष्ट्र टाइम्स’ या अग्रेसर दैनिकाचे संपादक श्री. गोविंदराव तळवलकर हे व्यासंगी संशोधक आणि सव्यसाची लेखक म्हणून सुविख्यात आहेत. आधुनिक भारताच्या इतिहासावरील त्यांचे ग्रंथ जाणकारांना सुपरिचित आहेत. कम्युनिझमच्या एकाधिकारशाहीचे ते प्रथमपासूनच वैचारिक विरोधक आहेत. दुष्ट कालचक्राचे बंदी झालेल्या काही रशियन साहित्यिकांची `अभिजात’ या त्यांच्या ललित लेखसंग्रहातील व्यक्तिचित्रे रसिकमान्य आहेत.
पूर्व युरोपातील शक्तिहीन प्रजेची शक्ती जागृत होऊन जे काही उठाव झाले, ते रशियाच्या मदतीने पाशवी लष्करी बळावर दडपले गेले. परंतु 1985 साली रशियाचे अध्यक्ष श्री. गोर्बाचोव यांनी पुनर्रचनेचे धोरण स्वीकारले आणि पूर्व युरोपातील सर्वंकष राजवटी धडाधड कोसळल्या. जर्मनीचेही एकीकरण झाले.
या देशांना भेट देऊन या क्रांतिकारक घटनांचा प्रत्यक्ष अनुभव लेखकाने घेतला. या बदलत्या राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक घटनांची तपशीलवार व तौलनिक चर्चा करतानाच त्यांचे नवीन आंतरराष्ट्रीय पडसाद, नव्या आशा-आकांक्षा यांचेही विवेचन श्री. तळवलकर यांनी केले आहे. गेली चाळीसएक वर्षे रशिया व त्याच्या वर्चस्वाखालील पूर्व युरोपीय देश यांमधील घडामोडींचे अभ्यासपूर्ण, तर्कसंगत विश्र्लेषण ते अग्रलेख व लेख यांद्वारे करीत आले आहेत. या देशांना मधून मधून भेटी देऊन लिहिलेल्या या लेखांमुळे तेथील स्थित्यंतराचा इतिहासच आपल्यासमोर उलगडतो.
भविष्यातील घटनांची चाहूल लागणे आणि योग्य परिवर्तनासाठी काय पावले टाकली पाहिजेत, याची स्पष्ट कल्पना येणे हा अभिजात इतिहासकाराचा मोठाच गुण. कम्युनिझम नामशेष होऊन पूर्व युरोपीय देशात लोकशाही स्वातंत्र्याचे वारे खेळतील, हा लेखकाने पूर्वीच वर्तविलेला अंदाज केवळ आशावाद न राहता आज सत्यस्थितीत उतरला आहे. प्रासादिक शैली आणि अवघड विषयही सोपा करून सांगण्याची हातोटी यांमुळे केवळ अभ्यासकांनाच नव्हे, तर सामान्य वाचकालाही हा ग्रंथ आनंददायी ठरेल.