Summary of the Book
या नाटकातील काही समस्या, त्या त्या माणसाच्या स्वभावामुळे, काही संस्कारामुळे, काही वृत्तींमुळे, काही आसपासच्या माणसांमुळे, वातावरणामुळे निर्माण झालेल्या दिसतात. कमी अधिक प्रमाणात, आपल्यालाही कुठे कुठे त्या जाणवलेल्या असतात. परिणामी हे नाटक आपले वाटते. कुणाचे बरोबर, कुणाचे चूक, याचा विचार आपण करू शकतो आणि आपण असे आहोत का? आपण कसे नसावे? हेही आपल्या लक्षात येते. हेच या नाटकाचे यश आहे.
अतिशय मार्मिक आणि प्रातिनिधिक दृष्टीने लेखक रत्नाकर मतकरी यांनी ही घटस्फोटांची प्रकरणे निवडली आहेत. सूक्ष्म निरीक्षण, आकलन आणि त्यांचे नाट्यरूपांतर करताना अगदी सहज नैसर्गिक वाटावे असे लेखन, प्रसंगयोजना, संवाद, घटनाक्रम यामुळे हे नाटक अतिशय पकड घेते. खरे तर प्रत्येक घटस्फोटाचे प्रकरण वेगवेगळे आहे. तथापि पहिले प्रकरण संपले की पुढच्या प्रकरणाविषयी उत्सुकता वाटू लागते. विशेष म्हणजे लेखन आणि सादरीकरणात कुठेही `मेलोड्रामा’ केलेला नाही; तर तुमच्या आमच्या घरी घडतील असे प्रसंग इथे घडतात. पात्रे सहजपणे वागतात, परिणामी आपले, आपल्या आजूबाजूच्या माणसांच्या घरातले प्रसंग आपण पाहतो आहोत, असे वाटते. हे या नाटकाचे फार मोठे बलस्थान आहे.
सारांश, बर्याच दिवसांनंतर विचार करायला लावणारे, विलक्षण प्रत्ययकारी आणि प्रत्येकाला खूप काही देणारे असे हे नाटक आले आहे. प्रपंच करणार्या आणि करू इच्छिणार्या प्रत्येकाने हे नाटक वाचायला-पाहायला हवे. या नाटकाशी नाते जोडायला हवे.
-बंडा जोशी, समीक्षक, प्रभात, 23 डिसेंबर 2001