Summary of the Book
"गझलरंग" मुशायरयांनी बघता बघता शंभराची संख्या ओलांडली. या वाटचालीमध्ये य मंचावरून सादरीकरण करणाऱ्या दीडशे हून अधिक गझलकारांचा सिंहाचा वाटा आहे. यात महिला गझलकारही मागे नाहीत. खानदेशकन्या हेमलता पाटील हे त्या पैकी एक आश्वासक नाव. गेल्या दीड - दोन वर्षांपासून गझल लेखनाकडे वळलेल्या हेमलता ताईंचे अलीकडच्या काळातील सातत्य कौतुकास्पद आहे. अक्षरगण वृताप्रमाणेच मात्रावृताच्या प्रांतातसुद्धा त्यांची गझल सफाईने संचार करते. त्यांच्या रचनांमध्ये खानदेशच्या भूमीतील अंगभूत लयबद्ध गोडवा असल्याने या रचना कोणत्याही अंगाने कृत्रिम वाटत नाहीत. अभिव्यक्तीमध्ये एक लोभसवाणी सहजता सामावलेल्या शहाऐंशी रचनांचा या संग्रहात समावेश आहे. त्यांच्या 'असेलही नसेलही' या संग्रहाचे महाराष्ट्रातील गझलरसिक उत्साहाने स्वागत करतील अशी खात्री वाटते. " जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही." गझलसम्राट सुरेश भट यांना अभिप्रेत असलेल्या विजा घेऊन येणाऱ्या पिढीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या गझलकारा हेमलता पाटील यांना भावी काळातील गझलमुशाफिरीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा !