Summary of the Book
मराठी वाड.मय प्रकारात 'कादंबरी' हा साहित्यप्रकार खूपच लोकप्रिय !आमयुष्य जसं वळणं घेत जातं तशी मराठी कादंबरीने अनेक वळणे घेतली आहेत .जीवनातील नातेसंबंध हा मात्र कादंबरीचा प्रामुख्याने गाभा! नातेसंबंधातील अनेक कंगोरे उलगडता- उलगडता कादंबरीला एक छानशा शेवटापर्यंत घेऊन जाणं हे कादंबरीकाराचे कसब! सानिया, गौरी देशपांडे, आशा बगे, राजन गवस या दिग्गज साहित्यिकांनी तर आपल्या लेखनातून आगळ्या वेगळ्या संकल्पना मराठी साहित्यविश्वाला दिल्या.
कादंबरीचा अवाका, भाषा आणि संवेदनशील शेवट घेऊन येणारी लेखक विनय नारायण यांची अशीच जीवनाच्या "विशेष गोष्टीचा" वेगळा वेध घेणारी "एक नातं अनोळखी" ही एक सहजसुंदर कादंबरी! संवेदना प्रकाशनाने प्रकाशित केलेली ही ऐन लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवरील अतिशय डोळसपणे विचार व्यक्त करणारी आणि आधुनिकता आणि अभिनव विचार यांनी ओतप्रोत असणारी तरीही भारतीय संस्कारांचा आदर करून नातेसंबंधांना संयतपणे
न्याय देणारी अशी आगळी वेगळी कादंबरी!
कादंबरीची सुरूवातच वेगळ्या अर्पण पत्रिकेने होते. जीवनातील अटळ सत्य म्हणजे "मृत्यू". लेखकाने ही कादंबरी कोरोना मध्ये बळी गेलेल्या मृत्यूला समर्पित केली आहे. इथूनच कादंबरीचे वेगळेपण जाणवू लागते .लेखकाने कादंबरी मागची लेखन प्रेरणा म्हणून समोरच्या बिल्डींग मधील टेरेसवर मास्क लावून भेटणाऱ्या तरुण-तरुणी वर घेतल्याचे शेवटी सांगितले आहे.
सुरुवातच अशी होते की,वाचकांची जिज्ञासा चाळवते. कोणतेही पारंपारिक संदर्भ न देता टेरेसवर भेटणाऱ्या "ती" आणि "तो" च्या संबंध जीवन पटाची सुरुवात होते, लेखक तीन शब्दांची जुळवाजुळव करणारी 'ती' उभी करतो आणि 'आई कशी आहे?' या तीन शब्दांनी वाचकांचा भ्रमनिरास होतो मात्र वाचक एक स्मितहास्य करतो कपाळावर कोणतीही आठी न उमटवता हे या लेखनाचं प्राबल्य आहे. यानंतर 28 वर्षाचा 'तो' आणि 31 वर्षाची 'ती' यांची आजच्या युद्धापेक्षा वेगळी प्रेम कहाणी आकार घेताना तब्बल पंधराव्या पानावर आपल्याला कबीर व राधा ची नावे कळतात .आईबरोबर चेस मध्ये मुद्दामून हरणारा कबीर आईची योग्य ती चिंता करणारा तरुण तर पप्पांसोबत आईविना असणारी राधा त्याची आई सारखी काळजी घेणारी सहजपणे उभी करण्यात लेखक यशस्वी ठरला आहे.
लेखकानेही ही दोघेही एकमेकांत गुंफतानाही त्यांच्या नात्याला स्पेस दिल्याचे जाणवते. पण तरीही या युगातील तरुण-तरुणींपेक्षा ती वेगळी करण्याचा लेखकाचा प्रयास जाणवतो. एका ओळखीतही मुलं आजकाल एकमेकांचे नंबर्स शेअर करतात पण इथे कबीर आणि राधा शेवटपर्यंत नंबर शेअर करत नाहीत. तिने दिलेले पॅन केक्स ती टेरेसवर कबीर साठी घेऊन येते हे पचवायला थोडेसे कठीण जाते. मात्र तिचा Resilient लिहिलेला टी-शर्ट त्याला काही सुचवण्यासाठी ती घालते तेव्हा ते पुन्हा या युगातील युगुल बनतं.
मॅरेज ब्यूरो मध्ये बऱ्यापैकी अनुभव दोघांनीही घेतलेले आहेत. कबीर आणि राधा हे एका नव्या विश्वाचे प्रतीक आहेत आणि तरीही आपल्या जीवनातील मूल्य ते जपताना दिसतात.हा आदर्शच जणू ही कादंबरी जपण्याचा प्रयत्न करते. रोजच्या टेरेस वरील भेटीत एकमेकांमधला खरा जोडीदार ते शोधत असतात तिथेच लेखक म्हणतो, " ती लिफ्ट मध्ये गेल्यावर दरवाजा बंद झाला खरा पण दोन मनांचे दरवाजे मात्र उघडले होते "
दोघेही व्हर्जिन असल्याचा एकमेकांना सहजपणे निर्वाळा देतात. या पिढीतील ही सहजता लेखकाने अलगद टिपली आहे तसेच " मी त्याची कंपनी सायलेंटली एन्जॉय करतो" अशी वाक्ये बरेच काही सांगून जातात.
कबीरची आई आणि राधाच्या पप्पांना दोघांच्या लग्नाबाबत, निर्णयाबाबत उत्सुकता आहे .कबीरच्या आईला कबीरच्या "विक्षिप्त" मनाची कल्पना आहे पण तरीही एका योग्य निर्णयाप्रत येईपर्यंत दोघे भेटतच राहतात. यासाठी 'रॅपिड फायर राउंड' सारखी प्रश्नोत्तरे किंवा सोसायटीतील लोकांना दिसेल असा दोघांचा वाॕक, त्याच्या ऑफिसमधील त्यांची मीटिंग, टेरेस वरील भेटी, दोघांच्या घरी आई पप्पा सोबत च्या भेटी, फोनवर राधाचा कबीरच्या आईसाठी आणि कबीरचा राधाच्या पप्पांसाठी मेसेज या सर्व गोष्टीतून लग्न ही एक महत्त्वपूर्ण आणि विचारपूर्वक करण्याची गोष्ट आहे हेच सूचित होते. कबीर एक संवेदनशील चित्रकार तर राधा ही कार्पोरेट क्षेत्रात चांगल्या पोस्टवर.
कबीर लग्नाच्या बाबत घाई करत नाही "आयुष्य म्हणजे गाणं असेल तर त्यातला ठह राव जगता आला पाहिजे" म्हणणारा कबीर कादंबरीच्या शेवटपर्यंत घाई करत नाहीच तर ठहराव जपताना जाणवतो. एका ठिकाणी लेखकाने या प्रेम नाट्यात सूर्यदेवाला सहभागी करून त्याचे ही मनोगत मांडले आहे ते त्या वातावरणाला साजेसे ठरते. कधीही खोटे न बोलणारा कबीर राधेला "खरं बोलून नाती तुटतात " हा सल्ला देताना दिसतो.
रोजच्या भेटीतून राधाचा होकार जवळजवळ कळतो आणि कबीर एक वेगळी गोष्ट तिला होकारासोबत सांगतो आणि जिच्यासाठी राधा खूप विचारांती तयार होते. कबीरची आई कबीरला नीट जाणत असल्याने दोघांच्या या जगवेल्हाळ निर्णयाला दुजोरा देते मात्र राधाचे पप्पा होकार देत नाहीत. हा निर्णय कोणता हीच तर कादंबरीची गंमत आहे.त्यासाठी ११८पानांची सर्वांगसुंदर कादंबरी वाचणेच क्रमप्राप्त आहे.
आजच्या समाजात काही आदर्श प्रस्थापित करण्यासाठी, लेखनातून जी मुल्य यायला हवीत त्यापैकी लग्न संस्थेच्या संदर्भात कबीर- राधा चा निर्णय लेखकाने मूल्य म्हणून कादंबरीतून समाजासमोर ठेवला आहे. त्यातूनच वेगळा विचार करण्याची शक्ती आणि वृत्ती समाजाला मिळू शकते.
कथेला साजेसे सुंदर मुखपृष्ठ श्री. निलेश जाधव यांनी साकारले आहेत मलपृष्ठावर कादंबरीतील तीन सुंदर परिच्छेद लेखकाच्या फोटो सोबत आहेत. कादंबरीचे शीर्षक खरोखरीच कथानकाला साजेसे आहे. कादंबरीतील प्रत्येक वाक्य राधा म्हणते तसं कबीराच्या "दोह्याप्रमाणे" रसिक वाचकाला लिहून ठेवण्याजोगी आहेत , जगावेगळा पण वास्तवस्पर्शी विचार करायला लावणारी आहेत. सहजसुंदर भाषा, प्रगल्भ विचार आणि जीवन मूल्य जपणारी ही कादंबरी आजच्या युगाला नक्कीच काहीतरी भरीव देऊन जाणारी आहे हे मात्र निश्चित!!