Summary of the Book
नागपूर प्रसिद्ध कादंबरीकार श्री. मनोहर तल्हार लिहितात.... 'नटरंग’ वाचली. शेवटचे पान मिटले आणि लगेच पहिल्या पानापासून पुन्हा दुसर्यांदा वाचून काढली. 'नटरंग’ ने मला झपाटून टाकले. एका कलावंताची शोकान्तिका मनाला पिळून पिळवटून गेली. आणि म्हणूनही मन 'सुखावून’ गेले. हे 'सुखावणे’ कलानंदी टाळी लागण्याचे ! कादंबरीचा रचनाबंध अतिशय रेखीव आहे... देखणा आहे... एखाद्या शिल्पासारखा ! दगडातले शिल्प जिवंत व्हावे आणि बघणारा, अनुभवणारा दगडासारखा निश्चल व्हावा, तसे कलात्मकतेचे हे परिपूर्ण भान भुरळ घालणारे ठरावे.... मला ही कादंबरी महाकाव्य सदृश वाटली...’
तर दुसरे तितकेच प्रसिद्ध कादंबरीकार वि. शं. पारगावकर लिहितात - गेल्या तीन दशकांतील (1950 ते 1980) ज्या काही कादंबर्यांनी ठसे मराठी ललित साहित्याच्या क्षेत्रात उमटविले त्यांमध्ये आनंद यादव यांच्या 'नटरंग’ चे यश उल्लेखनीय ठरेल. चाकोरीबाहेर जाऊन निवडलेली कलावस्तू, निवेदनाचे साधेच परंतु आशयानुकूल आणि अर्थगर्भ स्वच्छ रूप, नेमक्या प्रतिमांच्या साह्याने खुलत जाणार्या प्रसंगांची दीप्ती, भोवतालच्या परिसराचे मूळ कथावस्तूशी निगडीत झालेले नाते आणि संपूर्ण आशयातून व्यक्त होत गेलेली मनाची स्पंदने ही कादंबरीची वैशिष्ठ्ये आहेत.
अशी दाद अनेक कादंबरीकारांनी अनेक समीक्षकांनी, अनेक वाचकांनी 'नटरंग’ला दिली त्यामुळे मला जे काही म्हणावयाचे होते ते 'नटरंग’च्या अनुभवाद्वारा व्यक्त झाल्याचे समाधान मिळाले.