Summary of the Book
कवयित्री लता गुठे यांचा 'चांदणबाग' हा बालकाव्यसंग्रह प्रकाशित होत असताना मनात आनंदाच्या लाटा उसळत आहेत. मुले आभासी जगात रमतात , वाचनात रस घेत नाहीत , असा मुलांवर आरोप होतो . पण मुलांसाठी विशेष साहित्य उपलब्ध नाही . ही तक्रार दूर करण्याचा मार्ग मोठ्यानीच शोधायला हवा , याची जाणीव असलेल्या लता गुंठे यांनी प्राप्त परिस्थितीवर उतारा शोधण्याचा सतत प्रयत्न करत आहेत . त्यांची 'बिनभिंतीची शाळा' हा बालकथासंग्रह वाचल्यापासून मला त्यांच्या शैलीची भुरळ पडली आणि शोधक नजरेने त्यांची निर्मिती जाणण्याचा मला छंद जडला . त्यांच्या कवितेतील संवेदनशील आणि तरलतेच्या मी प्रेमात पडले , असे म्हणणे अतिशोयोक्ती ठरणार नाही . अशा संवेदनशील कवयित्रीने मुलांसाठी कविता लिहिणे , हे मुलांचे भाग्याच !
'चांदणबाग' या कवितेत चंद्रात ससा वा हरीण दिसणे , सोनपरीबरोबर आकाशात भटकंती करून चक्कर येणे नि पावसाच्या सरीसंगे वास्तवात कोसळणे केवळ अप्रतिम ! परीच्या रूपाच्या रोमांचक कल्पनेत रमलेल्या बाल जीवांना लागलेली आईच्या कुशीची ओढ लताला कळते . लाजाळूच्या फुलाशी केलेला तरल संवाद मनाला भुरळ घालतो . आईच्या वाढदिवसाची संवेदनशील कल्पना , चिकुबाई - मिकुबाईशी केलेला संवाद वाचताना मजा येते . उन्हात पडलेल्या पावसात निर्माण झालेल्या इंद्रधनुष्याचे कौतुक नि पावसातल्या सहलीची रोमांचक कल्पना मुलांचं भावविश्व साकारते . 'समजून घ्या रे'मधील रसाळ भाषेत केलेला उपदेश असो , गणपतीबाप्पाची कविता असो की हल्लीच्या शिक्षण प्रणालीत दप्तराच ओझ उचलायला लावून मुलांचं गाढव झाल्याची कटू जाणीव 'पक्षांचा गाव' या शेवटच्या कवितेपर्यंत कवयित्री मुलांच्या भावविश्वाशी समरस झाल्याची सातत्याने प्रचिती मिळते .
वयाचे ज्येष्ठत्व जमेस धरून तिचे भविष्यातील सर्व प्रयंत्न यशस्वी होवोत आणि तिची भरारी आकांक्षापुढती गगन ठेंगणे सिद्ध करो , असा आशीर्वाद देते.