Summary of the Book
हिन्दी चित्रपटात गाणी हा अविभाज्य भाग असतो. अगदी तुरळक चित्रपट त्याला अपवाद ठरावेत. अनेक चित्रपट त्यातील श्रवणीय गाण्यांमुळे पाहिले जात असत. चित्रपटातून संगीताचा समावेश झाला तो पहिला बोलपट 'आलमआरा'मधून ज्यांना गायन कला अवगत आहे, अशांनाच चित्रपटात काम मिळत असे. हिंदी चित्रपटात पार्श्वगायनाला संगीतकार पंकज मलिक यांनी सुरवात केली. १९३३च्या काळातील 'धूपछॉंव' चित्रपटात पहिले पार्श्वगायन झाले. त्यानंतर अनेक संगीतकार उदयास आले.
गायकांना घडविणाऱ्या, रसिकांच्या ओठी आपले संगीत अजरामर करणाऱ्या दिग्ग्द संगीतकारांचा सुरीला परीचय अशोक उजळंबकर यांनी 'रसिक बलमा'मधून करून दिला आहे. अनिल विश्वास, नौशाद, मदन मोहन, खेमचंद प्रकाश, हुस्नलाल भगतराम, स्नेहल भाटकर, वसंत देसाई, उषा खन्ना, सुधीर फडके, एस. डी. बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, शंकर जयकिशन असा ३४ ज्येष्ठ, श्रेष्ठ संगीतकरांच्या आठवणी, त्यांची कारकीर्द, गाजलेली गाणी यांच्याद्वारा हिंदी चित्रपटांचा सुवर्णकाळ उभा केला आहे. प्रत्येक संगीतकाराच्या परीचयाला त्यांच्या गाजलेल्या गीताचे शीर्षक दिल्याने, त्यासंबधीच्या आठवणी जाग्या होतात.