Summary of the Book
सन १५९९ ते सन १६०८ पर्यंतच्या कालखंडात शेक्सपिअरच्या हातून प्रामुख्याने शोकनाट्येच उतरली. या सात वर्षांच्या कालखंडाला आपण 'शेक्सपिअरच्या शोकनाट्याचा कालखंड' असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. 'कोरिओलेस' हे शेक्सपिअरने लिहिलेलं शेवटचं शोकनाट्य. त्यानंतर त्याने कारुण्याच्या छटेमुळे सुखान्तिकेपेक्षा कमी आल्हादक आणि उदात्त विचारांमुळे गंभीर झालेली, तरीही शांत-प्रसन्न स्वरुपाची रम्यकथात्मक स्वरुपाची नाटके लिहून आपल्या स्वतंत्र लेखनाला पूर्णविराम दिला. मानवी जीवनाची वास्तविकता आपल्या शोकनाट्यामधून प्रेक्षकांपुढे मांडताना शेक्सपिअरला हेच सूचित करायचं होतं की हे अमर्याद जीवन द्वंदात्मक आहे. इथे चांगुलपणाचा मोबदला मिळेलच असं नाही. दुष्टांचं पारिपत्य होईल असंही नाही. क्वचित दुष्टच ऐश्वर्य भोगतील आणि सज्जनांची विटंबना होईल. मूर्खांच्या कृत्याचं परिमार्जन करण्यासाठी निष्पाप जीवांचं बलिदान होईल. परंतु या सुखदु:खापेक्षा मानवी जीवन भव्य आणि विराट आहे. आणि मानवी उदात्तता सूर्याइतकीच दैदिप्यमान आहे. माणसाच्या प्रेमभावनेचा सुगंध जगातल्या कोणत्याही फुलाच्या सुगंधापेक्षा अधिक गंधपूरित व सूक्ष्मतरल असूनही चिरकाल टिकणारा आहे. माणस