Summary of the Book
शिक्षणासाठी, नोकरी-व्यवसायासाठी, नवीन ज्ञान मिळविण्यासाठी, प्रगतीसाठी माणूस परदेशगमन करतो. या व अन्य कारणांसाठी ऑस्ट्रेलियात स्थलांतरित झालेल्या भारतीयांची गोष्ट सुहास जोशी यांनी 'स्नेहबंध - गोष्ट ऑस्ट्रेलियातील भारतीयांची'मधून सांगितली आहे. विश्वनाथ उर्फ नानासाहेब आपटे हे मुंबईच्या कोहिनूर मिल्सचे एक भागीदार.
व्यवसायवृद्धीसाठी त्यांनी ऑस्ट्रेलियाला अनेकदा भेट दिली आणि १९५८ मध्ये ते सहकुटुंब तेथील निवासी झाले. आपटे हे ऑस्ट्रेलियातील पहिले मराठी कुटुंब. वाईचे डॉ. जयंत बापट ऑस्ट्रेलियातील मोनॅश युनिव्हर्सिटीत शिकण्यास आले आणि नंतर तेथेच स्थायिक झाले. तिसरे कुटुंब डॉ. दिलीप चिरमुले यांचे. त्यांनी १९६६ मध्ये सिडनेत नोकरी सुरु केली. कालांतराने ते पौरोहित्य करू लागले.
व्यवसायाने टेक्स्टाईल इंजिनिअर असलेले सतारवादक पं. राधेश्याम गुप्ता हे मुळचे आग्र्याचे. ऑस्ट्रेलियातील पहिल्या मराठी संशोधिका डॉ. मिनोती आपटे, टाकाऊ पदार्थ वापरून दणकट रस्ते बनविणारे अभियंते डॉ. विजय जोशी, नृत्यांगना तारा राजकुमार, फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ. विनिता हार्डीकर अशा ४४ भारतीयांची ऑस्ट्रेलियातील कामगिरी, त्यांची कौटुंबिक माहिती यामुळे ऑस्ट्रेलिया व भारत या देशांमध्ये नवीन स्नेहबंध जुळून आले आहेत.