Summary of the Book
नव्याने उघडलेल्या पोलीस आऊट पोस्टवर नक्षलवादी आदिवासींच्या हल्ल्याचे नेतृत्व कॉ. कमला करते. ह्या चकमकीत ती जखमी होऊन जंगलात एका वस्तीवर जाऊन बेशुद्ध पडते. वस्तीवरील लोक तिला डॉ.गांधींच्या दवाखान्यात नेतात. डॉ.गांधी यांनी डॉ.बाबा आमटे ह्यांच्या समाज कार्याने प्रेरीत होऊन आदिवासींच्याकरीता सारे जीवन अर्पण करण्याच्या हेतूने जंगलात एका खोपटा मध्ये दवाखाना सुरु केलेला असतो. कमलाच्या शरीरात दोन ठिकाणी बंदुकीच्या गोळ्या घुसलेल्या असतात. तिच्या उपचारा चालू असताना डॉक्टर आणि कमला एकमेकांच्या प्रेमात पडतात. अतिरेक्यांना मदत केल्याबद्दल पोलीस डॉक्टरांना पकडतात आणि त्यांचे अतोनात हाल करतात. ज्या तुरुंगात डॉक्टरांना ठेवलेले असते त्या तुरुंगावर कमला डॉक्टरांना सोडविण्यासाठी हल्ला करते आणि डॉक्टरांना सोडवते. आता डॉक्टर आणि कमलाचा जंगलातील प्रवास सुरु होतो. त्यांचा आदिवासींच्या बरोबर जीवन, राहणी, विचारसरणी यांच्याशी सूर जमतो.
कांता हि कमळाची धाकटी बहिण. तिला हे नक्षलवादी जीवन बिलकुल आवडत नाही. ती एका मुला बरोबर पळून जाते. आणि रायपुर मध्ये येते. तिथे तिचे अपहरण होऊन तिची रवानगी वेश्याबाजारात होते. तेथून ती पळ काढते आणि थेट दिल्लीत पोहचते. योगायोगाने तिथे तीची एका सामाजिक कार्यकर्त्याबाईच्या नजरेत पडते आणि तिच्या आयुष्याला कलाटणी मिळते.
डॉक्टरांना अतिरेक्यांच्यावरील प्रत्येक हल्ल्यानंतर अतिरेक्यांची मलमपट्टी, औषधोपचार हेच करावे लागते. डॉक्टर हे काम केवळ कमलाकरता करतात पण नाराजीनेच.
एका घातपाताच्या योजनेत डॉक्टरांच्या दवाखान्याजवळ एक लष्करी जवान बेशुद्ध अवस्थेत सापडतो. डॉक्टर त्याला वाचवतात, त्याची सुश्रुता करतात आणि पळून जाण्यास मदत करतात. त्याआधी अतिरेकी, माओवादी यांच्या विषयीच्या ब-याच गोष्टी ते त्या जवानाला सांगतात. कमलाही आता हळूहळू बदलू लागली आहे. जवानाला पळून जाण्याच्या मार्गाचा ती नकाशा काढून देते हे या वरून स्पष्ट होत. तो जवान आपल्या वरिष्ठ अधिका-याना भेटतो व हि सर्व गुप्त माहिती त्यांना पुरवतो.
कांताने आता आपले नाव बदलले आहे. ती कोकिळा म्हणजे कोकी या नावाने वावरते. एका उच्चवर्णीय मुलाच्या प्रेमात पडते. ती त्या मुलापासून गरोदर राहते.
एका हल्ल्यासाठी माओवाद्यांचा मोठा ताफा हायवेवर लपून बसला आहे. योग्य वेळी ते हल्ला करतात. त्याच वेळेला डॉक्टर आणि कमला तेथून पलायन करतात. हल्ल्याच्या ठिकाणपासून डॉक्टरांची “उपचार” छावणी बरीच दूर आहे. डॉक्टर गुजरात प्रांतात जाण्याचा निर्णय घेतात. दोघेही पायी प्रवास करतात. या प्रवासात त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. अखेर ते एका भिल्लांच्या वस्तीमध्ये येतात आणि तेथेच ते स्व:ताचे हॉस्पिटल थाटतात.
तिकडे सुटून गेलेल्या जवानाच्या माहितीवरून शासन हवाईहल्ला सुरु करते आणि सर्व माओवादी मारले जातात.
कोकीचे तिच्याच एका जातीच्या मुलाशी लग्न होते आणि ते एकत्र नांदू लागतात.
डॉक्टर आणि कमला भिल्लांच्या सेवेत राहून नर्मदेची परिक्रमा करण्यचा निर्णय घेतात. त्यांची परिक्रमा पूर्ण होते. कमला आता आई होणार आहे. डॉक्टर आपल्या आईला फोन करून हि गोड बातमी सांगतात आणि आता याच ठिकाणी आम्ही सेवाव्रती म्हणून काम करणार आहोत असा निर्णय सांगतात.