Summary of the Book
शेतकऱ्याचे जीने हे शहरी माणसाला कळू शकत नाही. भाज्या, फळे महाग झाली की सर्वत्र ओरड होते, पण ते पिकवणाऱ्या शेतकऱ्याच्या हातात काय पडते, याचा विचार होत नाही. आधुनिक शेती खर्चिक झाली असून, खर्च व उत्पन्नाचा मेळ घालणे शेतकऱ्यांना कठीण होत आहे. त्यात छोट्या शेतकऱ्यापुढे आव्हाने जास्त असतात. कैलास दौंड यांनी 'कापूसकाळ'मध्ये कापूस पिकवणाऱ्या जगू आणि सुशा या शेतकरी दांपत्याचे जीवन रेखाटले आहे. अगदी जमिनीची मशागत करण्यापासून, बी-बियाणे, खाते, औषधे मिळण्यापर्यंत कायम मनात चिंता घर करून असते. यानंतर पीक कसे येईल, त्याची वेचणी, विक्री भाव आदि काळजीने हा छोटा कापूसउत्पादक काळजीत असतो. त्याचे कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार यांच्याबाबतच्या अडीअडचणीही त्यापुढे असतात. अशा रोजच्या धबडग्यातही भरपूर उत्पादन मिळून सुखाचे दिवस येतील, अशा स्वप्नात तो रोज झोपी जात असतो. शेतकऱ्यांचे कष्ट, आयुष्याची लढाई म्हणजे काय हे यातून समजते.