Summary of the Book
देशीवादाची नव्याने मांडणी करण्याची गरज आहे, असं मला वाटतं. ज्यात 'अनारकी' केंद्रस्थानी असेल आणि जोहरच्या निमित्ताने या अनारकीच्या मांडणीची सुरुवात झाली आहे. कारण जोहारचा आजचा काळ सर्वार्थाने खूप वेगळा आणि आव्हानात्मक आहे. जोहारच्या पहिल्या प्रकरणात त्याचा नायक भालचंद्र नेमाडे यांच्याशी नाळ सांगतो; पण दुसऱ्या प्रकरणापासून तो त्यांच्यापासून फारकतही घेतो, ते अगदी शेवटच्या प्रकरणापर्यंत. म्हणजे मधल्या प्रकरणांत पांडुरंग कुठेच भेटत नाही. ही फारकत म्हणजेच देशीवादाच्या दुसऱ्या टप्प्याची आश्वासक सुरुवात आहे.
जोहारच्या काळात हरितक्रांती संपलेली आहे. या संपण्यातून येणारी अनारकी जोहारच्या पानापानांवर येते. ही कादंबरी शेवटच्या पानापर्यंत शहर आणि ग्रामीण अशी नैसर्गिकपणे हिंदकळत जाते. गावपण, माणूसपण, मूल्ये संपूर्णतः नष्ट होण्याचा संघर्ष जोहारमध्ये आलेला आहे. अशा अनेक अर्थाने ही कादंबरी मला महत्त्वाची वाटते. त्या दृष्टीने जोहार हा अतिशय लक्षणीय टप्पा आहे. त्यामुळे जोहारचा विचार करताना परात्मभावाने, तुटलेपणाने निर्माण केलेल्या अराजकाचा नीट विचार केला पाहिजे. या अराजकाचा नीटपणे विचार केला नाही, तर ही कादंबरी वाचताना अनेक गफलती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सुशील जोहारमध्ये या सगळ्या शक्यता, सामर्थ्ये व्यक्त करतो आणि कुठलाही दावा करत नाही. म्हणजे सगळ्या शक्यता आणि सामर्थ्ये दाखवणं, काय बदललं पाहिजे आणि कसं बदललं पाहिजे हे नैसर्गिकपणे सांगणं, त्याचा कसलाही दावा न करणं, मोहापासून स्वतःला बाजूला ठेवणं, हे आजच्या इतक्या विद्रोही काळात अवघड काम आहे. लेखक म्हणून हे सुशीलचं आणि जोहारचं यश आहे.