Summary of the Book
सन २००० च्या अखेरीस प्रकाशित झालेले हे माझे चवथे पुस्तक. १९८४ पासून मी, कॉलेज मध्ये जाणार्या व नोकरी-व्यवसायाला लागलेल्या तरुण-तरुणींबरोबर, कौंसेलिंगच्या निमित्ताने, त्यांचं जग समजून घेण्यासाठी पुष्कळ वेळ दिला होता. झपाट्यानं बदलत जाणारं जग मी पहात होते. नाहीशी होणारी मूल्येही बघत होते. पाश्चात्य संस्कृतीचा पगडा किती खोल झिरपतो आहे, ते बघत होते. लग्नापूर्वीचं वर्तन, विचारसरणी आणि लग्न झाल्यानंतर आलेली आव्हानं यात, मुलांची किती कुचंबणा होतीय, ते मी पहात होते.
भारतीय नाळ तर तोडायची नाही, जुने आदर्श तर जपायचे, मात्र नवीन बदलही स्वीकारायचे, यातून जगाभरातील तरुणाई जात होती. भारत व परदेश दोन्हीकडे वास्तव्य, नोकरी-व्यवसाय, दोघांकडच्या घरचे वातावरण, चालीरीती इ. गोष्टी तरुणांच्या प्रेम-लग्न-वैवाहिक जीवन यावर कसा प्रभाव टाकतात, हे दिसत होतं. त्यातून झालेल्या विचारमंथनातून सर्व तरुणांना सांगण्यासारखे समाईक (कॉमन) काही दिसते का? याचा माझा शोध चालू झाला. हाहा म्हणता पुस्तकच तयार झाले.
जे तरुण-तरुणी माझ्यापर्यंत येऊ शकत नाहीत, त्यांच्यापर्यंत माझे विचार हे पुस्तक पोचवील, असे वाटून मला खूप समाधान झाले. प्रमोद प्रकाशनने झटपट पुस्तक तयार केले. याच्या प्रकाशनासाठी शोभाताई भागवत, डॉ. उल्हास लुकतुके आले होते. एक परिसंवादच आयोजित केला होता. सर्व कार्यक्रम प्रेक्षकांना सहभागी करुन घेतल्याने अतिशय जिवंत व परिणामकारक झाला. त्याचे प्रकाशक अचानक गेल्याने यथावकाश हे पुस्तक out of print झाले. त्याचे इ-बुकही प्रकाशित करीत आहोत.