Summary of the Book
तिचे नाव लल्ला ! लल्लेश्वरी, लल्ला , ईश्वरी , लल्ला अरीफा, लस , छंद , लल्ल देद असा नावांनी ती ओळखली जाते. ती जन्मली चौदाव्या शतकात , पण आज सहाशे वर्षाहूनही अधिक काळ ती काश्मिरी माणसांच्या स्मृतीत जिवंत आहे . तिच्या वाणीची सुभाषिते झाली आहेत . मंदिरामधून आणि मशिदी -दर्ग्यामधून तिची वचने ऐकवली जात आहेत. जात , धर्म पंथ आणि काळ यांच्या मर्यादा ओलांडून ती अद्यापही चैतन्यशील आहे. कारण ती केवळ संत नाही , केवळ ती कवयित्री नाही तर पाच - साडेपाच हजार वर्षांच्या काश्मिरी संस्कृतीला तिने आवाज दिला आहे.
हा आवाज एका विशिष्ट प्रादेशिक संस्कृतीचा आहेच , पण त्यात विशाल मानवी संस्कृतीचेही ध्वनी उमटले आहेत. ती एक फिरस्ती जोगीण होती. स्वत:च्या शोधात निघालेली जोगीण . तिने कोणत्याच साखळ्या आपल्या पायात पडू दिल्या नाहीत .. ना कोणत्या विशिष्ट जातीच्या , धर्माच्या , प्रदेशाच्या .... ! विशिष्टतेच्या मर्यादामध्ये ती अडकलीच नाही , ती वैश्विक होत गेली.