Summary of the Book
शाळेतील अंतिम म्हणजे एस.एस.सी. परीक्षा देऊन कितीतरी विध्यार्थी दरवर्षी शाळेतून बाहेर पडतात. परंतु शाळा सोडून पन्नास वर्षे उलटून गेली तरी आपल्या शाळेबद्दल आणि वर्गमित्रांबद्दल ओढ असलेले विध्यार्थी फारच विरळा. अशा विरळा माजी विध्यार्थ्यांपैकीच एक लेखक श्री. मोहन रणसिंग. कुडाळ हायस्कूल ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित आणि प्रतिष्ठित शिक्षणसंस्था. लेखक या हायस्कूलमध्ये १९६५ ते १९६९ अशी चार वर्षे विध्यार्थी होते. ती चार वर्षे आपल्या आयुष्यातील अनमोल ठेवा असं ते मानतात. एवढी वर्षे उलटून गेली तरीही या चार वर्षांच्या भावनिक विश्वातून लेखक बाहेर पडू शकलेले नाहीत. या चार वर्षांतील शालेय जीवनाचा लेखाजोखा या पुस्तकातून त्यांनी मांडलेला आहे.
पण हे पुस्तक म्हणजे केवळ आठवणींची जंत्री नाही. या आठवणी, हा भूतकाळ रेखाटताना तो रंजक व उत्कंठावर्धक होईल याचीही खबरदारी लेखकाने घेतलेली आहे. आठवणींच्या अनुषंगाने विविध माहिती ते वाचकांसमोर सादर करतात. त्यात शाळेचा इतिहास, शाळेचा परिसर, शिक्षक आणि त्यांची अध्यापन पद्धती, क्रीडांगण, खेळाडू, वर्गमित्र, वाचनालय, गॅदरिंग, कलाकार विध्यार्थी, कर्मचारीवृंद इत्यादींचा धांडोळा त्यांनी घेतलेला आहे. विशेष म्हणजे पन्नास वर्षे उलटून गेली तरी या वर्गमित्रांना शोधून काढण्याची असोशी, ती पूर्ण करण्यासाठी घेतलेले कष्ट आणि वर्गमित्र भेटल्यानंतर त्या सर्वांना एकत्र आणण्यासाठी वर्गमित्रांची चाललेली धडपड. हे सर्व अगदी उत्कंठावर्धक शैलीत या पुस्तकात वाचायला मिळते.
याच वर्षी कुडाळ हायस्कूलला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत आणि लेखकाने हायस्कूल सोडल्यावर पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. या सुवर्ण योगावर हे पुस्तक प्रकाशित होत आहे याचीही दखल लेखकाने घेतलेली आहे. या सर्वांमुळे केवळ हायस्कूलच्या विध्यार्थी -माजी विध्यार्थी यांनाच नव्हे तर सर्वसामान्य वाचकांच्या मनाची पकड हे पुस्तक घेऊ शकते.