कोयाडे सरांना पहिल्यांदा भेटण्याचा योग आला तो स्व. स्वप्नील कोलते पाटील यांच्या "मुकद्दर" या कादंबरी प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने. कोयाडे सरांची भाषा आणि बोलणं अगदी साधं. त्यांची प्रतिपश्चंद्र हि कादंबरी माझ्याकडे आगोदरच खरेदी केलेली होती. पण वाचण्याचा योग काही येत नव्हता. एका बाजूला छ. शिवरायांबद्दल वाचन चालू होतं, तर बहिर्जी नाईक यांच्याबद्दल हळू हळू लेखनही. त्यातच फेसबुकवर विजयनगर साम्राज्याबद्दल वाचनात आलं, आणि प्रतिपश्चंद्रची आठवण झाली. पुस्तकांच्या कपाटात कित्येक दिवस माझ्या वाचनाच्या प्रतीक्षेत वाट पाहणारं ते पुस्तक बाहेर काढलं. घड्याळात रात्रीचे अकरा वाजले होते. म्हटलं, सुरुवातीची काही पानं वाचूया. पण मग झोप कुठे लागतेय. वाचता वाचता पुस्तक अर्ध्याच्या वर कधी गेलं आणि पहाटेचे चार कधी वाजले कळलंही नाही. पुस्तक हातातून खाली तर ठेऊ वाटेना पण झोपही आवश्यक होती. पुस्तक ठेऊन दिलं, पण स्वप्नातही वाचलेलं कथानक गोंधळ घालत होतं. उठायला तसा उशीर होणारच होता. ९ वाजता उठलो नि सरळ पुस्तक घेऊन बाथरूममध्ये शिरलो. दहा मिनिटांचं काम अर्धा एक तासावर गेलं. दारावर बायकोची थाप पडली, नि पोटात पुस्तक लपवत पटकन आवरून बाहेर आलो. चहा घेऊन पुन्हा गॅलरीमध्ये पुस्तक हातात घेतलं. बायकोनं दिलेले पोहे खायचं सुद्धा भान राहिलं नाही. दुपारी बारा वाजता पुस्तक वाचून संपवलं. पण त्या कथानकातून अजूनही बाहेर आलेलो नाहीये.
एखाद्या चित्रपटालाही लाजवेल इतकं थरारक नि अप्रतिम कथानक. निसर्गवर्णन, प्रसंग, आणि संवाद रचना यांचा सुंदर मिलाप असलेलं, हे मराठी मातीतल्या मराठी माणसानं लिहिलेलं मराठी पुस्तक. पुस्तक म्हणा, कादंबरी म्हणा, कथा, इतिहास, ग्रंथ काहीही म्हणा. एवढा सहज सुंदर आणि माहितीपूर्ण ठेवा म्हणजे प्रतिपश्चंद्र!
छ. शिवरायांच्या राजमुद्रेतील "प्रतिपश्चंद्र" हे प्रथमाक्षर! आणि हेच अक्षर वाचकाला रहस्याच्या शेवटपर्यंत एखाद्या मार्गदर्शक, गाईड सारखं सतत आपल्या आसपास असल्यासारखं वाटतं राहतं. नकळत संदेश देत राहतं. भारतावर सुरुवात झालेल्या पहिल्या परकीय आक्रमणापासून ते छ. शिवरायांच्या मृत्यूपर्यंतच्या ऐतिहासिक सत्य घटना, तसेच ऐतिहासिक संदर्भ आणि सद्यपरिस्थिती यांच्यावर कल्पनाशक्तीची अद्भुत शाल पांघरून वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवत विचार करायला भाग पाडणारं लेखन म्हणजे "प्रतिपश्चंद्र"
कादंबरीच्या सुरुवातीलाच स्वराज्याची राजधानी रायगड स्वतः आपल्याशी खरंच संवाद साधतोय असं वाटतं. रायगड असंच आपल्याशी कायम बोलत राहावं, त्याचं मन मोकळं करत राहावं, आणि आपणही मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहावं असं वाटतं. लेखकाच्या लेखणीची आणि कल्पनाशक्तीची दाद द्यावी तेवढी कमीच आहे. हिंदू संस्कृतीमध्ये आपल्याला माहिती असलेले विष्णूचे दहा अवतार, महादेवाची मंदिरं बंधामागचं कारण, शुभ लक्षणी असलेलं स्वस्तिक, हात जोडून केलेला नमस्कार, या गोष्टींचं अभ्यासपूर्ण, मनाला पटणारं, वास्तवाशी आणि विज्ञानाशी सुसंघटित असं वक्तव्य वाचतच राहण्यासारखं आहे.
सुरुवातीपासूनच वाचकाच्या मनाची पकड घेत चालू होणारं कथानक, अचानक घडणाऱ्या घटनांमुळे वेगवान होऊ लागतं. नकळत वाचक कथानकात आणि त्या रहस्यमध्ये गुंतत जातो. कादंबरीच्या नायकाबरोबर फिरताना वाचक निसर्गाची विलोभनीय वर्णनं, इतिहास, तत्वज्ञान, आणि प्रसंगानुरूप आलेले संवाद वाचण्यात गुंतून गेल्याशिवाय राहणार नाही.
पूर्ण कादंबरीमध्ये लेखकाने कुठेही छ. शिवराय, कि जे एक स्वराज्य निर्माता, उत्कृष्ट राजा, आणि आदर्श व्यक्तिमत्व आहेत त्यांचं कुठेही दैवतीकरण केलेलं नाहीये. भारतीय इतिहासातील तेरावे, सतरावे आणि एकविसावे शतक यांची कल्पनातीत सांगड घालण्यासारखं शिवधनुष्य लेखकाने ज्ञान, शब्द आणि कल्पनेच्या जोरावर ताकतीने पेललं आहे.
कादंबरीचं मुख्य कथानक म्हणजे विजयनगर साम्राज्याचा गुप्त खजिना आणि त्यापर्यंत पोहोचण्यासाठी आजपर्यंत केलेल्या प्रयत्नांची आणि थरारक प्रसंगांची मालिका. हंपी म्हणून प्रसिद्द असलेलं कर्नाटक मधील ऐतिहासिक ठिकाण म्हणजेच विजयनगर साम्राज्याची राजधानी. या विजयनगर साम्राज्याने परकीय आक्रमणांपासून आपला खजिना एका गुप्त ठिकाणी हलवला? त्यानंतर परकीय बहामनी राज्याची वारंवार आक्रमणे होत राहिली आणि हे साम्राज्य लयास गेलं आणि त्यांचे वारसही अज्ञातवासात गेले. पण जेव्हा शिवराय दक्षिणेच्या मोहिमेवर होते तेव्हा याच विजयनगरच्या वंशजांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि कित्येक वर्षे गुप्त ठेवलेल्या खजिन्याचं रहस्य महाराजांच्या हवाली केलं. पण महाराजांना यातलं काहीही एक नको होतं. कारण आयतं किंवा फुकटचं मिळाल्यावर काय होतं? हे त्यांना चांगलंच माहिती होतं. त्यामुळे त्या खजिन्याचे आपण मालक न बनता रक्षक होण्याची जबाबदारी महाराजांनी शिरावर घेतली आणि हि जबाबदारी पार पाडण्याचं काम अर्थातच गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक यांच्यावर सोपवण्यात आली. ज्याप्रमाणे कोळी आपल्या सावजाला पकण्यासाठी फसवं जाळं विणतो त्याप्रमाणे बहिर्जी आणि महाराजांनी एक योजना आखली, खजिन्याच्या संरक्षणासाठी जाळं विणलं. आणि त्यासाठी ठेवले आठ शिलेदार. तेव्हापासून ते आजपर्यंत त्या आठ शिलेदारांचे वंशज त्या खजिन्याच्या रहस्याची जिवापेक्षा जास्त काळजी घेतात. तो खजिना मिळवण्यासाठी त्या शिलेदारांच्या जीवावर उठलेले शुत्रूचे वंशज ते आजपर्यंतचा त्या खजिन्याच्या शोधाची थरारक कहाणी म्हणजे "प्रतिपश्चंद्र"!
सर्वात शेवटी पुन्हा एकदा जेव्हा रायगड आपल्याशी संवाद साधतो तेव्हा कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं.असं वाटतं आपल्या दैवताची पंढरी आपल्याशी पुन्हा एकदा तिच्या मनातलं गूढ आपल्याला सांगू पाहतेय. आणि यावर कळस म्हणजे कादंबरीमध्ये एका रहस्याचा शोध घेता घेता सर्वात शेवटी लेखकाने जो धक्का दिलेला आहे,ते वाचून तर आपण अक्षरशः अवाक होऊन जातो. खजिन्याचं रहस्य स्वतः वाचून अनुभवण्याची जी मजा आहे ती इथं थोडक्यात देऊन रहस्यभेद करणं योग्य ठरणार नाही. Thank You...
एक रहस्य कथा म्हणून ठीक आहे, पण काही गोष्टी खटकतात, हॉलिवूड पट बनवण्याचा प्रयत्न झालाय, धावपळ खूप जास्त जलद झाली आहे जि अपेक्षित नाही, आणि त्यात आणखी ५० पाने कमी होऊ शकली असती जर कथे मध्ये मध्ये विषय सोडून भरकटली नसती तर, महाराजांमुळे वाचन केले, पण काही गोष्टी खरच संशोधन करण्यासारख्या आहेत......
Vaishnvi Kulkarni
03 Aug 2023 05 30 AM
Angels and demons movie सारखी कथा आहे अगदी सेम अगदी पात्रं सुद्धा थोड्या फार फरकाने सारखेच आहेत. कथेतील आणि सिनेमातील स्थळं सुद्धा सारख्या संदर्भात येतात जसं की सिनेमातील ऐतिहासिक व्हॅटिकन सिटी बनते पुस्तकातील ऐतिहासिक औरंगाबाद शहर . खूप खूप साम्य आहे महाराजांचा संदर्भ घेऊन लिहिले आहे त्यामुळे सुरवातीला वाटते की काहीतरी करा इतिहास असेल पण माझा तरी विरस झाला.बाकी भाषाशैली आणि उत्कंठा छान टिकवू ठेवली आहे.
सनी मच्छिंद्र पोखरकर
03 May 2023 05 30 AM
आजवर वाचलेली सर्वात उत्तम कथा यात मांडलेली आहे एकदा नक्की वाचून पहा 🙌🚩🧡
Chandrakala S.Shendge
24/11/2022
Mi hi kadambari vachli.... khajinyacha shodh lavla ith paryant khup chhan .... parantu maharajanchya sinhasana baddal ji mahiti lihili ahe... ase aikivat ahe ki sanhasan che ajun tari shodh laglela nahi
Kiran Jadhav
07 Oct 2022 05 30 AM
Dan brown या लेखकाच्या पठडीतील / शैलीतील या कादंबरीची बांधणी आहे . पुस्तक खूपच रहस्यमय आहे. एकदा वाचाच .
मयूर क्षीरसागर
17/05/2022
अत्यंत मनोरंजक व वाचकांना खिळवून ठेवणारे पुस्तक,
कथा उत्तम आहे. पण काही मूलभूत चुका आहेत. चूक क्रमांक एक ही की श्रावण हा साधारण जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात येतो. पुस्तकात जूनच्या सुरवातीला श्रावण दाखवला आहे. तसेच आनंद चित्रपटातलं जिंदगी कैसी है पहेली हे गाणे किशोर कुमार ने नाही तर मन्ना डे यांनी गायलं आहे. व्याकरणाच्या पण अनेक चुका आहेत. कथा छान आहे. पण भाषेचा अभ्यास अधिक हवा होता
Dr Shubham jadhav
27/07/2021
very amazing book sir, and informative too, and I like your presentation of any. moment it's really feels like reality whenever I read it , thanks for this Wonderful book ,. jay shivray
‘प्रतिपश्चंद्र’ मराठीतील पहिली शिवकालीन ऐतिहासिक रहस्य कादंबरी… एक अद्भुत साहित्यकृती! छत्रपती शिवाजी महाराज आणि गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक यांनी अत्यंत गुप्त पद्धतीने लपविलेले रहस्य…एक असे रहस्य ज्याची सुरक्षा आजही महाराजांच्ये आठ शिलेदार जीवाची बाजी लावून करत आहेत. गेल्या साडेतीनशे वर्षांपासून अत्यंत गुप्त आणि गुढ पद्धतीने एक युद्ध या मातीत सुरू आहे. या युद्धात आजवर शेकडो लोकांनी एकमेकांच्ये जीव घेतले… जीव दिले आहेत. चौदावे शकत, सतरावे शतक आणि एकविसावे शतक या तीन कालखंडाना जोडणारी ऐतिहासिक थरार कादंबरी ‘प्रतिपश्चंद्र’!.
इतिहासावर प्रेम करणाऱ्याने ही कादंबरी वाचावी. पुढे लिंक देत आहे.https://amzn.to/3zTi5WT
Prathamesh Ambede
26/01/2021
amazing...
Naresh Gaikwad
09 Jun 2019 05 30 AM
Must read