Summary of the Book
मी शिरीष काणेकरला कधी भेटलो? आठवत नाही. बहुधा सत्तरीच्या दशकात असावं. मात्र कुठे, कसा हे प्रयत्न करूनही आठवत नाही. त्याचं व्यक्तिमत्त्व असं आहे की आपली सदाचीच ओळख आहे असं वाटत राहतं. तो लेखक, मी व्यंगचित्रकार. पण या नात्यानं आम्ही भेटलो असू असं वाटत तरी नाही. 'श्री' साप्ताहिकाचा ( कै.) वसंत सोपारकर हा आमचा दोघांचाही मित्र होता. तो कदाचित आमच्यातला दुवा असावा. शिरीष लेखणीने कोणाकोणाची टोपी उडवायचा, तेच काम मी ब्रशनं करायचो. आम्हाला एकमेकांच्या कलेविषयी भारी कौतुक होतं. शिरीष कणेकरशी संवाद साधणं नेहमीच आनंददायी असतं. त्याचं बोलणं पारदर्शी व काळजाच्या तळापासून असतं. त्यात खोटेपणाचा लवलेश नसतो. बोलण्यात शिरीष कणेकरचा हात धरता येत नाही. त्याच्या लेखी टोपी उडविणे महत्त्वाचे. मग ती टोपी स्वतःची का असेना.
व्यंगचित्रकार म्हणून विनोद व विसंगती मी टिपत असतो. तीच गोष्ट शिरीष त्याच्या लेखणीद्वारे करीत आलाय. त्याचा कुठलाही लेख वाचायला सुरुवात केली की संपूर्ण वाचल्याशिवाय हातातून खाली ठेववत नाही. वाचनीयता हे लेखनवैशिष्ट्य त्यानं थोडीथोडकी नाही तर पन्नास वर्ष टिकवलयं. ताजेपणासाठी त्याची सदाबहार लेखणी ओळखली जाते. वाणी आणि लेखणी दोन्हींची धार त्यानं यत्किंचितही कमी होऊ दिलेली नाही.