vaibhavi
01 Aug 2020 05 30 AM
महाभारत म्हटलं की, कृष्ण आणि कृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश हे आपल्या मनावर ठसलेले आहे. ऐन वेळी कच खाणार्या अर्जुनाला उपदेश करणारा कृष्ण, हा जरी देवाचं रूप असला तरी तो मांनुष्यरूपाने पृथ्वीतलावर आल्यामुळे त्याला देखील मनुष्यधर्माला येणारी सुख, दुःख, वासना, मोह,निराशा इत्यादी भावनांच्या आवेगाला सामोरे जावे लागले असेल का?
कृष्ण आणि पर्यायाने द्वारकेचा होत गेलेला विनाश; त्याचे द्वारकेतील आणि द्वारकेशी संबंधित लोकांवर झालेले परिणाम; द्वारकाविनाश या पुस्तकातून व्यक्त होतात.अगदी सामान्यातील सामान्य माणूस ज्याचा प्रत्यक्ष युद्धाशी काही संबंध नाही; त्यापासून ते युद्धात पुत्र, पिता,बंधू गमावलेल्या अनेक कुटुंबांची दशा यात दाखवली आहे. अतिसुखाने माणूस जसा अकार्यक्षम होतो तसाच अतिदुःखाने देखील होतो . तसेच काहीसे घडले असावे का? कोणतेच ध्येय नसल्यामुळे एकेकाळी सर्वगुणसंपन्न असलेल्या नगरीचा र्हास थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. सत्तांतर, योग्य मार्गदर्शन, क्रियाशीलता,स्पर्धात्मकता, प्रभावी नेतृत्व या सर्वांचा अभाव कसे एखादे राज्य पोखरू शकते याचे यथार्थ वर्णन येते.
meenal nene
02 Jul 2019 05 30 AM
ज्येष्ठ लेखक ती. अनंत मनोहर यांचे परवाच प्रकाशित झालेले पुस्तक 'द्वारकाविनाश ' हाती घेतले आणि पूर्ण वाचूनच खाली ठेवले.
विनाश नकोसा वाटत असला तरी तो कसा झाला, का टाळता आला नाही याबद्दल मनात उत्सुकता असतेच.
प्रत्यक्ष परमेश्वर पाठीराखा असूनही यादवांची मती कशी भ्रष्ट झाली आणि त्यांनी आपला विनाश कसा ओढवून घेतला ते समजून घेताना, पात्रांबरोबर आपण त्या कालखंडात कधी ओढले जातो ते कळत नाही.
मानवी भावभावनांच्या अत्यंत सूक्ष्म छटा इथे पहायला मिळतात. जीवनाचे सर्व कंगोरे उलगडून दाखवणारी
ही कादंबरी उत्पत्ति स्थिती लय याचे सर्वंकष दर्शन घडवते. कोणत्याही साम्राज्याच्या लयाची बीजे त्याच्या उत्पत्तीतच तर दडलेली नसतील ?
हार, जीत ,त्याच्या पलीकडे गेलेल्या व्यक्ती ,मानवी गुण, दैवी गुण या सर्वांच्या क्रिया प्रतिक्रियांचा विणलेला पट म्हणजेच 'द्वारका विनाश '.