Summary of the Book
'रिंगाण' या कृष्णात खोत यांच्या कादंबरीत विस्थापितांच्या
जगण्याचं आलेलं चित्रण हा कादंबरीचा दृश्यस्तर; तर उत्क्रांतीच्या
नव्या दिशेचं दर्शन हा गर्भित स्तर आहे. देवाप्पाच्या पाळीव म्हशी रानटी होतात, त्यांच्या मूळपदावर जातात आणि त्यातून त्यांचा नि देवाप्पाचा संघर्ष उभा राहातो. हा संघर्ष
देवाप्पाचा नि फक्त त्यांचा न राहाता मानवजातीचा नि निसर्गाचा होतो. हे कोडं उत्क्रांतीचं आहे. प्राणी उत्क्रांत होत असताना परिस्थितीनुसार शरीरात आवश्यक ते बदल करत उत्क्रांत होत गेला. पण त्याच प्राण्यामध्ये आपल्या मूळ पिंडावर जाण्याची क्षमताही असते हे देवाप्पाबरोबर संघर्ष करणाऱ्या म्हशींच्या वागण्यावरून लक्षात येते. निसर्गानं करून ठेवलेली ही सोय मानवप्राणीही कधीतरी उपयोगात आणील हे या कादंबरीतून सूचित होते.
सजीवांच्या उत्क्रांतीची ही नवी दिशा एखाद्या ललितकृतीतून
मांडली जाणं ही मराठी साहित्यविश्वातील पहिलीच घटना आहे.
डॉ. आनंद जोशी