Summary of the Book
विलास गावडे यांचे या कथासंग्रहापूर्वी 'कॅनव्हास' , 'घुसमट' , 'अखेरचं आवर्तन संपेपर्यंत' आणि 'उजेडाची सावली' हे चार कवितासंग्रह प्रकाशित झालेले आहेत . त्यांच्या ह्या कवितासंग्रहांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत . प्रखर सामाजिक जाणीव असलेले असलेले कवी म्हणून ते मराठी साहित्य वर्तुळात नावाजले जात आहेत. हीच प्रखर सामाजिक जाणीव त्यांच्या 'आव्हान' या कथासंग्रहात पण अधोरेखित होते . कामगार संघर्ष आणि कामगार संबंध , तसेच व्यवस्थापन , कामगार आणि युनियन यांच्यामधील व्यामिश्र गुंतागुंतीची वीण या कथासंग्रहात प्रकर्षाने अनुभवायला मिळते .
केवळ अपघातानेच कामगार संबंध आणि कामगार संघर्ष या क्षेत्रामध्ये ते शिरले . गिरणगावात जन्मलेले आणि वाढलेले विलास गावडे कामगार आणि कामगार चळवळीतल्या तरुण कार्यकर्त्यांच्या संपर्कात असायचे . कामगारांचे प्रश्न सोडविण्याच्या आशेपोटी त्यांनी परळ , मुंबई येथील महाराष्ट्र श्रम विज्ञान , या संस्थेतून मुंबई विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी घेतली आणि खर्या अर्थाने त्यांचा या क्षेत्रातील प्रवास सुरु झाला . व्यवस्थापनातील वरिष्ठांशी , कामगार संघटनांशी , शासकीय अधिकाऱ्यांशी , तर कधी गुंड प्रवृत्तीच्या कामगारांशी त्यांना संघर्ष करावा लागला . या 'तारेवरच्या कसरती' करताना ते अनुभवसंपन्न होत गेले . त्याचेच प्रतिबिंब प्रस्तुत ' तारेवरच्या कसरती ' या कथासंग्रहात अनुभवायला मिळतात . ३७ वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवातील काही घटनाना या संग्रहात त्यांनी कथारूप दिलेले आहे . सदर कथा बहुपेडी असून कामगार , व्यवस्थापन , कामगार युनियन यांच्यातील संघर्ष त्यांनी उत्तमपणे सदर कथांमध्ये अभिव्यक्त केला आहे . सदर कथा एकापेक्षा एक वेगळ्या असून त्यात नाट्य ठासून भरलेले आहे . प्रत्यक्ष घटीतांचा आधार या कथांना लाभलेला असल्याने वाचकांना त्यातून कलात्मक आनंद मिळेल , असे मला मनापासून वाटते .