Summary of the Book
‘आयुष्य कसे जगावे?’ हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. बालपणापासून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मी शिक्षण, व्यावसायिक व राजकीय क्षेत्रात नाव मिळविले. बालपण, शिक्षण, अर्थकारण व राजकारण अशा भागांत मी माझे जीवन या आत्मचरित्रात उलगडले आहे. एवढेच नव्हे तर सर्वांना अटळ असणाऱ्या मरण या विषयावरही मी माझे विचार मांडले आहेत.
खूप शिक्षण, आर्थिक संपन्नता आणि चारित्र्यासह कीर्ती मिळाली की आयुष्य सफल झाले असे मला वाटते. या तिन्ही गोष्टी मला साध्य झाल्या, तशाच माझ्या बरोबर इतर सर्वांना त्या ध्येय म्हणून मिळाल्या पाहिजेत. एवढेच नव्हे तर पुढच्या पिढीला सुद्धा प्रेरणा मिळाली की जीवन सफल झाले असे मला वाटेल. हे सर्व साध्य होण्यासाठी अभ्यास पाहिजे, मेहनत पाहिजे आणि मुख्य म्हणजे जिद्द पाहिजे. पण हे सर्व करताना आपल्या कृतीमागे आपला भारत देश कधीही विसरता येणार नाही. हे विचार कदाचित अतिशयोक्तीचे वाटतील म्हणून प्रथम आपली मानसिकता तशी तयार करणे आवश्यक आहे.
माझे बालपण गरीबीत गेले, जीवन कष्टात गेले. आयुष्यात अनेक चढउतार आले. परंतु आत्मविश्वास माझ्या मदतीला आला म्हणूनच मला प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक पाहण्याची सवय लागली. अपेक्षित यश काही वेळा ठराविक काळात मिळते तर काही वेळा उशीर लागतो पण ध्येय आणि जिद्द सोडता कामा नये. पहिली गोष्ट म्हणजे सुरुवातीपासूनच पुढे काय करायचे ते ठरवले पाहिजे.