Harish Indurkar
30 Apr 2021 08 26 PM
सुंदर शब्द रचना असलेलं हे पुस्तक आणि त्यात संपूर्ण हस्ताक्षरीत म्हणलं तर त्याची सुंदरता आणखीनच वाढते
त्यातील शब्द रचना आणि काव्य आणि त्याला सादर करण्याची कला खूप आवडली आहे
दुसऱ्या पुस्तकांची आतुरतेने वाट बघतो आहे
ते सुद्धा असच हस्ताक्षरीत आणि चित्र पूर्ण असेल अशी आशा - मिलिंद जोशींना माजा आदर पूर्वक प्रणाम 🙏
Milind D Joshi
23 Dec 2020 02 11 PM
या कवितासंग्रहाचं वैशिष्ट्य म्हणजे कविता कवीच्या हस्ताक्षरामध्ये आहेत. हस्ताक्षर हे व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब असतं. इथं तुम्ही कवितेबरोबर कवीही वाचू शकता. मिलिंदनं मुखपृष्ठ आणि मांडणी स्वतः केलेली आहे. आशयाप्रमाणं हस्ताक्षरात, मांडणीत बदल दिसतात. संग्रह पाहणं हा सुखद अनुभव आहे. वाचकाला त्यातून 'पर्सनल टच' ची अनुभूती मिळते. हे झालं दृश्य स्वरूप.
मी कवितेतला जाणकार नाही तरी मला जाणवलेली वैशिष्टयं -
मिलिंदच्या कवितेतील शब्द हे कविता म्हणून अलंकारिक, दुर्बोध असे नाहीत, ते रोजच्या जगण्यातलेच. मात्र आशयातून थक्क व्हावं इतकं तो तुम्हाला फिरवून आणतो. कल्पनांची जादुई कसरत त्यामध्ये असतेच पण त्यापलीकडे बरच काही अव्यक्त ज्यांन त्यानं आपापलं शोधावं असं मोठं अवकाश तो उपलब्ध करून देतो. कविता शब्दांमध्ये नसते तर दोन ओळींच्या मधल्या अवकाशात असते. ज्यामध्ये जो तो स्वतःला जोडून घेऊ शकतो, अशी साधीशी तरीही मोठा आशय कवेत घेणारी त्याची कविता आहे. मिलिंदची कविता कुठेही देवाला, दैवाला शरण गेलेली नाही. ती नियतीवादी, गूढवादी नाही तर समकालीन मानवी व्यवहारांच्या खोलीचा शोध घेणारीआहे.
महिन्याभरात दुसऱ्या आवृत्तीबद्दल अभिनंदन.
Sunil Godase
02 Jan 2020 10 42 AM
"असंच होतं ना तुलाही.." हा माझ्यासोबत तुलाही जोडून घेणारा एक सहज आविष्कार आहे!!
संगीतकार,गायक, चित्रकार, कवी मिलिंद जोशी यांचा हा पहिला कविता संग्रह!
एकदा हातात घेतला की आपण त्यात गुंतत जातो.. कवितेतल्या भावनेबरोबर बदलत जाणारं हस्ताक्षर आणि 'अ-क्षर'मांडणीचा अनुभव घेताना लक्षात येतं की ही "स्व - गत " च आहेत. स्थिती आणि लय यांना सामावून घेणारी ... त्यांना त्यांची स्वतःची एक गती आहे . आणि तरीही सगळं असूनही त्यात एक निरलस आलिप्तता आहे.
अतिशय साध्या शब्दांत भवतालाशी बंध जोडणाऱ्या उत्कट प्रतिमा असूनही "जीवन मला कळले हो" असा कुठल्याही प्रकारचा अभिनिवेश त्यात दिसून येत नाही. परस्पर अनुभूतीची जाणीव हा त्या त्या भावनेचा पाया आहे हे जाणवत राहतं.
आदिम संवेदनशीलतेला कालसापेक्षतेचं कोंदण मिळाल्यावर भावनांना जी झळाळी येते ती पानापानात दिसते. आणि म्हणूनच 'उन्हाला पडलेल्या घड्या',' मोह-निशा श्वासाची', 'श्वासांचे दोहे" हे केवळ शब्द प्रतिमांचे खेळ न वाटता हृदयातल्या भावनांचा तो एक प्रामाणिक उद्गार वाटतो !
जगण्यातले, आठवणीतले अनेक प्रश्न हे त्यांनीच शोधलेल्या उत्तरांमध्ये माणुसकीचा ओलावा शिंपडतात!
Samira Gujar
29 Dec 2019 11 03 AM
अतिशय बोलका काव्यसंग्रह....कारण ही कविता काव्यसंग्रहाच्या शीर्षकासारखी संवाद साधणारी आहे.खरतर,संपूर्ण काव्यसंग्रहाविषयी एक सरधोपट विधान नाही करता येणार कारण प्रत्येक कविता वेगळी आहे पण मिलिंद जोशी यांच्या या पहिल्याच काव्यसंग्रहाचे ठळक वैशिष्ट म्हणजे ह्या कवितेत शब्दाइतकेच लिपीला महत्त्व आहे. ही कविता मैफलीत ऐकण्याची आहे तितकीच 'डोळ्यांनी' वाचण्याची आहे. हे विधान तुम्हाला हा हस्तलिखित काव्यसंग्रह हाती धरल्याशिवाय कळणार नाही. संगीतकार, चित्रकार असा कवी असल्यामुळे कवितेला रुप,रंग, लय, तालाचे कोंदण मिळाले आहे. एका ताजेपणा सह भेटणारा हा कवितेचा नवाकोरा अनुभव जरुर अनुभवावा
smita paranjape
27 Dec 2019 11 31 AM
आपला स्वहस्ताक्षरात प्रसिद्ध झालेला काव्यसंग्रह मी माझ्या काही विद्यार्थ्यांना भेट दिला....तो हातात पडल्यावर लगेच त्याचे वाचन एकत्रपणे चक्क conference call वर आम्ही केले.....मुलं इतकी भारावून गेली होती...की दरक्षणी मॕडम ही ओळ वाचा..वा वा काय सुंदर ओळ आहे...अशा प्रतिक्रिया सतत येत होत्या...मी फक्त ऐकण्याचं काम करत होते...हे जवळजवळ १/२तास सुरु होतं.....म्हणजे कवितासंग्रह भेट देण्याचा माझा हेतू सफल झाला...पण कवितांना नवीन पीढी कडून जी दाद मिळाली ती आपणापर्यंत पोहोचवावीशी वाटली....एकीकडे तरुणाई तर दुसरीकडे माझ्या ७९वयाच्या बाबांनाकडूनही अशीच दाद ऐकायला मिळाली...मला म्हणाले.."ताई ,अगं सगळ्या कविता वाचून होईस्तोवर पुस्तक बाजूला ठेवलच नाही मी.प्रत्येक कविता किती बोलकी आहे"......म्हणजे वय वर्षे २०ते७९सार्यांनाच आवडेल अशा...आपल्याच वाटतील अशा असंख्य कवितांचे संग्रह प्रकाशित होतील अशी आशा आणि सदिच्छा💐🙏🏻🙏🏻
Nilima Dalvi
27 Dec 2019 07 14 AM
असंच होतं ना तुलाही..!!!
अगदी असंच होतं.. हल्ली ना मला राहून राहून असं खूप वाटायला लागलंय की पूर्वजन्मी किंवा याच जन्मात आजवरच्या आयुष्यात म्हणूया, माझ्या हातून काहीतरी चांगलं घडलं असणार म्हणून बावनकशी सोन्यासारखी दोन खरीखुरी माणसं माझ्या आयुष्यात गुरूरूपाने लाभली आहेत.. ती म्हणजे बहुआयामी व्यक्तीमत्व संगीतकार, चित्रकार, कवी मिलिंद जोशी सर आणि त्यांच्या सुरेल अर्धांगिनी मनिषाताई जोशी..!!
खरं तर मिलिंद सर आणि मिथिलेश सरांची संगीत कार्यशाळा करून आणि मनिषाताईंकडे शिकायला सुरवात करून फक्त सहाच महिने लोटले आहेत.. पण या सहा महिन्यांच्या अवधीत जी सकारात्मक ऊर्जा, जगण्यावर भरभरून प्रेम कसं करावं हे शिकायला मिळालं आहे ना ते शब्दात व्यक्त करणं कठीण आहे..!
आमची प्रत्यक्ष ओळख होण्यापूर्वी एक संगीतकार या नात्याने मिलींद सरांना फेसबुकवर मी फॉलो करत होते.. पण खरंतर त्यांच्या कामाशी खूप परिचित होण्याआधी त्यांच्या प्रसन्न निर्मळ हास्याने जी सकारात्मक ऊर्जा अनुभवली त्याने फेसबुकवर फॉलो करायची सुरवात झाली.. त्यावेळी वाटलही नव्हतं की आमची कधी प्रत्यक्ष भेटही होईल..!
Vishram Purushottam Abhyankar
26 Dec 2019 11 39 PM
असंच होतं ना तुलाही
मिलिंद जोशी यांच्या ' असंच होतं ना तुलाही ' या बुकगंगा पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने केलेल्या त्यातील निवडक कवितांच्या वाचनाची मेजवानी अनुभवून कान तृप्त झाले . कवीच्या कविता कवींच्या तोंडून ऐकणं हे विशेष आहेच पण त्याच्या कविता सादर करण्यासाठी प्रसिद्ध कविवर्य श्री वैभव जोशी , अभिनय , निर्मिती आणि दिग्दर्शन या सर्व भूमिकांत गगनभरारी घेतलेली पण जमिनीशी नातं टिकवून ठेवलेली सौन्दर्यवती कलाकार मुक्ता बर्वे आणि अर्थातच कविराजांच्या यशात मोठी भागीदार असणारी मिलिंद जोशी यांची सुरेल अर्धांगिनी मनीषा हे विराजमान होते .
श्री चंद्रकांत भोंजाळ यांच्या हस्ते त्यांना आणि गुरू कै यशवंत देव यांना अर्पण केलेल्या कवीच्या मोत्यासारख्या स्वहस्ताक्षरातील काव्यसंग्रहाच्या ई बुक , ऑडिओ बुक आणि पुस्तक यांचं एकत्रित प्रकाशन झालं . त्याचा चित्रकार , गायक , संगीतकार या क्षेत्रानंतर कवितेच्या क्षेत्रात मनिषाच्या जोडीने सुरू केलेला हा कलाप्रवास असाच सुरू राहो आणि रसिकांना त्याच्या कलागुणांची मेजवानी सतत मिळत राहो ही सदिच्छा !
Vishram Purushottam Abhyankar
26 Dec 2019 11 22 PM
असंच होतं ना तुलाही
नावात काय आहे असं कोणीतरी कधीतरी म्हणून गेलंय पण नावंच आपली ओळख असते जी कायम राहते . अतिशय साधं वाटणारं नाव पण स्वकर्तृत्वाने वलयांकित होऊन जातं जणू काही आभाळात दिसणारा ठळक ताराच .
दिवसभर नोकरी , व्यवसाय , मुलं बाळं अशा एक ना अनेक व्यापातून मार्गक्रमणा करणारे काही जीव विश्रांतीसाठी आणि विरंगुळ्यासाठी विसावले आणि डहाणूकर कॉलेजच्या क्षितिजावर प्रकाशमान होऊ लागले काही तारे , ज्यांच्या आगमनानेच जणू रखरखीत वाटणारा निसर्ग अगदी बहरून गेला आणि मग एकापाठोपाठ एक अशा शब्दरूपी , स्वररूपी गंधावलेल्या फुलांच्या वर्षावात न्हाऊन भान हरपलेले , सुखावलेले पांथस्थ विसरून गेले रोजची खडतर वाट .
ही किमया होती मिलिंद जोशी यांच्या ' असंच होतं ना तुलाही ' या बुकगंगा पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने केलेल्या त्यातील निवडक कवितांच्या वाचनाची. कवीच्या कविता कवींच्या तोंडून ऐकणं हे विशेष आहेच पण त्याच्या कविता सादर करण्यासाठी प्रसिद्ध कविवर्य श्री वैभव जोशी , अभिनय , निर्मिती आणि दिग्दर्शन या सर्व भूमिकांत गगनभरारी घेतलेली पण जमिनीशी नातं