Summary of the Book
श्रीमती नीलम गुप्ता यांच्या 'ओळन् ओळ आठवताना' या पहिल्या काव्यसंग्रहाचे स्वागत आणि त्यांचे अभिनंदन! प्रत्येक कवयित्रीची स्वतःची काव्यप्रकृती असते तशी नीलम गुप्ता यांचीही आहे; आणि त्यांच्या कवितेत ती प्रकट झाली आहे. त्यांच्या आयुष्यातील घटना, अचानक उद्रवलेले प्रसंग यांच्याशी ती निगडीत झालेली आहे. मानवी जीवन मोठे गुंतागुंतीचे आणि व्यामिश्र असते. ते सरळ रेषेत चालणारे नसल्याने त्यात खाचखळगे, धोके, वादळे यांचा सामनाही करावा लागतो. त्याचप्रमाणे या रेषांवर वाहणाऱ्या आनंदाच्या झऱ्याचा अनुभवही असतो; परंतु आनंदापेक्षा दु:खाचे क्षण प्रामुख्याने लक्षात राहतात, अशी काहीशी अवस्था कवयित्रीची झाली आहे.
या काव्यसंग्रहातील बहुतांश कविता आत्मनिष्ठेच्या पातळीवर अभिव्यक्त झाल्या आहेत. आयुष्यातील घडामोडींचा, त्यातून मार्ग काढणाऱ्या प्रयत्नांचा जीवनातील आशावादाकडे नेण्याचा, विरहातून सावरण्याचा; त्याचप्रमाणे नि:स्वार्थ प्रेमाचा आशय या कवितांमधून व्यक्त होतो. विरह पचवून आनंदाकडे कालभ्रमण करणाऱ्या या आशावादी कवयित्रीचे जीवन सतत फुलत राहो!