Summary of the Book
महात्मा ज्योतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा एखाद्या अभेद्य साखाळीसारखी आहे. या साखळीतील कडी अलग करता येत नाही. फुले (११ एप्रिल १८२७-२८ ते नोव्हेंबर १८९०), शाहू (२६ जुलै १८७४ ते ६ मे १९२२), आंबेडकर (१४ एप्रिल १८९१ ते ६ डिसेंबर १९५६) या तीनही महापुराषांवर युरोपमध्ये होऊन गेलेल्या प्रबोधनाच्या चळवळीचा परिणाम झाला होता. या चळवळीच्या आत-बाहेर होऊन गेलेल्या विचारवंतांचा परिणाम झाला होता. यालाच पुनरुज्जीवनवादी चळवळ म्हणतात. पण हे पुनरुज्जीवन ज्ञानाचे विचारांचे, चळवळीचे होते. प्रबोधन चळवळीची भारतातील अपत्ये म्हणूनही या तीन महापुरुषांकडे पाहता येते. सन १८२७ ते १९५६ म्हणजे फुले-शाहू-आंबेडकरी विचारांनी म्हणजे जवळपास शे-सव्वाशे वर्षे समाजात बदलासाठी, परिवर्तनासाठी विचारांचे चैतन्य निर्माण केले होते. फुले यांच्यावर थॉमस पेन यांचा, शाहू महाराजांवर फ्रेजर आणि युरोपातील स्वातंत्र्य, समतेचा, साम्यवादाचा परिणाम होता. बाबासाहेबांनी तर परदेशात शिक्षण घेताना जगप्रसिद्ध शिक्षक आणि त्यांचे विचार यांनी स्वतःला घडवण्याचा प्रयत्न केला होता.
फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांना कधीच प्रादेशिक, धर्मिक, जातीय सीमा नव्हत्या. त्यांचे बहुतेक विचार करणारे आहेत. नव्या माणसाचा, शृंखलामुक्त माणसाचा विचार करणारे आहेत. स्वातंत्र्य, समता, बंधुता, करुणा, शिक्षण हि वैश्विक मानवी मुल्ये आहेत. या मूल्यांचा जागर, प्रसार, प्रचार आणि नवनिर्मिती करण्यात या महापुरुषांनी आपले आयुष्य वेचले यात शंका नाही. जगातल्या अनेक राष्ट्रांनी आणि समाजाने या तीन महापुरुषांच्या विचारांची ढाल करून आपापल्या ठिकाणी लढण्याचा प्रयत्न केला आहे. या साऱ्यांच्या विचारांचा अभ्यास करून डॉ. रोहिदास जाधव आणि डॉ. संदीप कांबळे यांनी संपादित केलेला ग्रंथ म्हणून महत्वाचा आहे. या तीनही महापुरुषांचे विचार मानव जातीला मार्गदर्शन करण्यासाठी भविष्यातही दीपस्तंभ होऊन तळपत राहणार आहेत.