Summary of the Book
हे खरं आहे की, देश, समाज हा अनेक माणसं एकत्र येऊन निर्माण होतो. मात्र या देशाला, समाजाला ओळख प्राप्त होते ती या अनेक माणसांतील काही कर्तृत्ववान माणसांमुळे.
कर्तृत्वसंपन्न माणूस केवळ स्व्प्न पहात नाही, तो ती साकार करण्याचा प्रयत्न करतो. तो छोटी स्वप्नं पहात नाही, तर व्यापक समाजाच्या उन्नतीची स्वप्नं पहातो.
भारतातही उज्वल भविष्याची स्वप्ने पहाणाऱ्या अनेक कर्तृत्ववान, धाडसी, कल्पक व्यक्ती होऊन गेल्या आणि आजही आहेत.
सन १९९९ – २००० साली तत्कालीन केंद्रीय मंत्री श्री. अरुण शौरी यांनी ‘ विकसित भारता’ची स्वप्नं पहाणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तींना त्यांनी साकारलेल्या कल्पनांच्या अद्भूतरम्य कथा देशासमोर मांडण्यासाठी पाचारण केले. या साकारलेल्या कल्पना आम्ही अक्षरबद्ध केल्या आहेत.
या प्रतिभासंपन्न, कल्पक नेत्यांची मांदियाळी या निमित्ताने या अक्षरलेण्यांमध्ये एकत्र आली आहे. त्यांची अनुभवकथनात्मक अ-क्षरं आपल्याला निश्चित प्रेरक ठरतील.