Summary of the Book
भूतकाळ नाकारून वर्तमान उजागर करू पाहणारी ही कादंबरी देव, धर्म, जात, लिंगभेद, प्रदेशासह मानवी अस्तित्वाचा अर्थ शोधीत जाते. गाव-शहराच्या अभावाचा आणि बकालपणाचा कोलाज चित्रित करताना अस्तित्वाच्या गूढ शक्यतांचा तळ शोधणारी 'तणस' ही कादंबरी दिनेशने केलेल्या चिंतनाच्या रूपाने नवा आयाम वाचकांपुढे ठेवते. व्यक्तीची ओळख पुसून टाकणाऱ्या या शतकाने काळालाच ताब्यात घेतले आहे. त्यामुळे संभ्रमित वर्तमानाला लेखणीत पकडताना कादंबरीकार काळालाच नायक करून कादंबरीचा रूपबंध घडवतो.
वर्तमानावर आपली पकड घट्ट करताना दिनेशला लगटून येणारी सगळी माणसे भूतकाळाच्या आणि अर्थार्जनाच्या कचाट्यात सापडत असली, तरी ती मोडून पडत नाहीत. आपल्या वाटा आपणच शोधायला हव्यात ! चालताना रक्तबंबाळ झाले तरी, आपल्या जखमा आपणच बांधायला हव्यात, याव भरोसा ठेवून ती वाटचाल करीत राहतात.
धान्य उफणून मागे राहिलेला भुसा म्हणजे तणस; जो धान्याचे पोषण करतो, त्याचाच अंती कचरा होतो. भरणपोषण केले त्या धान्यावर त्याला हक्क सांगता येत नाही. अशा हक्क हरवून बसलेल्या सामान्य माणसांच्या कहाण्या अधोरेखित करताना ही कादंबरी काळ आणि अवकाशाच्या अनेक पातळ्यांवर वावरते. निवेदनाचे आणि शैलीचे विविध प्रयोग करूनही 'तणस'ने आपली अंगभूत लय आणि वाचनीय कोठेही हरवलेली नाही.