Summary of the Book
एकविसाव्या शतकाला सुरुवात होऊन आता चांगलं एक दशक उलटलं आहे. या दशकात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. पण त्याहूनही महत्त्वाच्या, म्हणजे भारताच्या आणि महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय वातावरणाला मुळापासून हादरवणार्या अनेक घडामोडी विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात घडल्या.
बाबरी मशिदीचा विध्वंस, मुंबईतले बॉम्बस्फोट, प्रथम महाराष्ट्रात आणि नंतर केंद्रात शिवसेना- भाजपचं सरकार येणं, हजारे- खैरनार यांचं भ्रष्टाचारविरोधी आंदोलन, एन्रॉनचा अपेक्षांचा फुगा, घाटकोपरच्या रमाबाई नगरातील दुर्घटना..
यांसारख्या अनेक घटनांचे हे दशक साक्षीदार आहे. त्यामुळेच हे दशक केवळ कालगणनेच्या दृष्टीने विसाव्या शतकातलं शेवटचं दशक होतं असं नव्हे, तर याच दशकाने सामाजिक- नैतिक मूल्यव्यवस्थेचा अंत उघडा डोळ्यांनी पाहिला. त्यामुळेच या दशकातल्या घटनांनी भारताचा इतिहासच बदलला.
तशी या घटनाक्रमाला सुरुवात झाली ती भाजपने छेडलेले राम जन्मभूमी आंदोलन आणि व्ही. पी. सिंगांच्या मंडल आयोगाच्या शिफारसींच्या अंमलबजावणीच्या निमित्ताने. पण या मुद्दयांनी आणि त्यांमुळे उदयाला आलेल्या जातीय-धार्मिक राजकारणाने खरे अक्राळविक्राळ स्वरूप धारण केले ते १९९२ नंतरच.
नेमक्या याच काळात सप्टेंबर १९९२ पासून संजय पवार यांचं पानीकम हे साप्ताहिक सदर आपलं महानगर या सायंदैनिकात प्रसिद्ध व्हायला लागलं. या सदरामुळे डोळ्यांसमोर घडणार्या प्रत्येक गोष्टीवर आपलं मत व्यक्त करण्याची संधी पवारांना मिळाली.
आंबेडकरी विचारांचा मजबूत पाया, लखलखीत- कसदार भाषा आणि उपरोधिक शैली या वैशिष्टांमुळे पवारांचे हे सदर अल्पावधीतच लोकप्रिय झाले. पुढे ते इतके लोकप्रिय झाले की, पवारांचा स्वत:चा असा वाचकवर्ग त्यामुळे निर्माण झाला. त्यामुळेच असेल कदचित हे सदर तब्बल जानेवारी १९९९ पर्यंत नियमित प्रसिद्ध होत होते. त्यानंतर एकलव्याच्या भात्यातून आणि चोख्याच्या पायaरीवरून ही सदरेही तितकीच लोकप्रिय ठरली. त्यातलं चोख्याच्या पायरीवरून हे सदर फेब्रुवारी २००१ ते फेब्रुवारी २००३ या काळात प्रसिद्ध होत होतं.