Summary of the Book
लेखिका मंगला सामंत ,प्रस्तूत पुस्तकाच्या नेचरॉलॉजीच्या आधाराने, निसर्गातील नर-मादी पासून सुरुवात करून, निसर्गातले स्त्री-पुरुष, त्यांची कळपावस्था,टोळीअवस्था, मातृकुळे,मातृसंस्कृती याचा विस्तृत पट मांडतात. त्याकरिता भारतातल्या प्राचीन मातृसंस्कृतीची अनेक उदाहरणे त्या देतात. हि संस्कृती नष्ट कशी झाली? त्याकरिता विवाह प्रथेचा उदय,पितृसंस्कृती याचे तपशील देत, मातृसंस्कृती आणि स्त्रिया यांची अवहेलना करण्याचे प्रयत्न कसे जगभर झाले, याबाबत वाङ्मये,नाटके,चित्रपट,धार्म,कायदे असे अनेक विषय त्या सोप्या भाषेत विशद करतात.
वर्षभरात येणारे भारतीय सण- सोहळे हा मातृदेशांच्या स्मृती जपण्याचा किवा पराक्रमाचा इतिहास जपण्याचा प्रयत्न असल्याचे त्या लिहितात.
त्याकरिता कृषीपंचमी (ऋषीपंचमी) गणेशचतुर्थी किवा घटस्थापना, संक्रांती हि सण-व्रते आज जरी पितृसंस्कृतीचा मुलामा देऊन साजरी केली जात असली तरी त्यांचा अंतरात्मा मातृसंस्कृतीचा कसा आहे हे त्या सांगतात.
त्या ओघात राम-सीता ,रावण ,कुंती,कोरव-पांडव, श्रीकृष्ण, शंकर व गणपती या सर्वांबाबतची ऐतिहासिक मीमांसा त्या करतात. मातृसंस्कृतीचा विनाश झाल्यामुळे स्त्रियांचे,मुलांचे,वृद्धांचे प्रश्न सध्याच्या पुरुषप्रधान पितृसंस्कृतीत कसे तीव्र झाले आहेत ते सांगून,पुस्तकाच्या अखेरीस बालकप्रधान समाजव्यवस्थेची गरज असल्याचे त्या आग्रहपूर्वक मांडतात. प्रस्तूत पुस्तक वाचनीयाच नव्हे तर अनेक संदर्भासाठी संग्रणीय सुद्धा आहे.