Summary of the Book
शरच्चंद्र वासुदेव चिरमुले ह्यांचा ‘‘श्री-शिल्लक’’ हा पहिलाच कथासंग्रह प्रकाशित झाला, आणि मराठी कथाकारांमध्ये त्यांचे मानाचे स्थान निश्चित झाले.
त्यांच्या कथांनी मराठी कथेला एक वेगळे, प्रौढ-प्रगल्भतेचे परिमाण दिले. कथेच्या अवकाशात इथे कादंबरीचे अवकाश सामावले आहे. इतर अनेक कथाकारांमध्ये न दिसणारी बौद्धिक, वैचारिक बैठक त्यांच्यामध्ये आहे. अर्थाशास्त्र, राज्यशास्त्र, वास्तुशास्त्र अशा विविध क्षेत्रांत चिरमुल्यांना स्वारस्य व गती आहे. संगीत ही तर त्यांची मर्मबंधातील ठेव. ‘मारवा’, ‘आवर्त’ सारख्या कथा या त्यांच्या जाणकार संगीत प्रेमातून निर्माण झाल्या आहेत. जीवनाच्या गाभ्याला भिडणारी चिंतनशीलता, अंतर्मुखता हे त्यांच्या कथांचे आंतरिक सामर्थ्य आहे.
अनाकलनीयतेच्या गूढाला ही कथा कधी स्पर्श करते, आणि वाचकाला मूक करते; मौनात तिचा संवाद सुरू होतो. ‘श्री-शिल्लक’सारखी कथा जिथे भावना, मती कुंठित होते, तेथे सुरू होते, आणि ती संपली तरी मनामध्ये उठलेली भाव-विचार वलये विस्तारतच राहतात. जीवनाच्या गूढाला स्पर्श करणार्या कथा चिरमुले जशा समर्थपणे लिहितात, त्याच सहजगतीने ‘धागे’, ‘एका स्टेशनमास्तराची गोष्ट’ सारख्या हळुवार, नाजुक कथाही लिहितात. ‘श्री-शिल्लक’, ‘युधिष्ठिराचा रथ’ यांसारख्या त्यांच्या कथा मराठी कथेच्या अक्षय रत्नभांडारात कधीच जमा झाल्या आहेत.
.