Summary of the Book
खरं तर लिहिताना झालेली आतड्याची कुरतड, कुठं लपवायची हाही प्रश्न असतो. जे घडलं ते जसंच्या तसं लिहून काढायचं, असं नसतंच. त्यात ही कुरतड मिसळत असते. अनुभवलेल्या वास्तवाचा, लिहिताना, पुन्हा अनुभव घेणं, असं ते स्वरूप असतं. ही कुरतडही लपवता येत नाही. अर्थातच कोणत्याही कवितेला (कथेला, कादंबरीला) जे रूप मिळत असतं ते या कुरतडीमुळे. तिचं स्वरूप व्यक्तिगत वा सामाजिक असं नसतं. दोन्ही गोष्टी मिसळलेल्या असतात.
कदाचित मी कवितेतून, ललित-वैचारिक लेखनातून ही कुरतड व्यक्त करू शकत असेन, त्यामुळे मी पुन्हा कथात्म साहित्याकडे वळलो नसेन. कदाचित कविता हा रूपबंध माझ्या सर्व स्फुरणांना सामावून घेणारा असेल, म्हणून मी कविता लिहित राहिलो असेन. मी कविता लिहायला लागलो तेव्हापासून पांढऱ्या कागदावर काळ्या रेषा ओढायला लागलो, तेही अजूनपर्यंत सुरूच आहे. त्या नि:शब्द कविता आहेत असंही म्हणता येईल.