मराठीतले प्रतिष्ठित कादंबरीकार रंगनाथ पठारे यांच्या दीर्घकथांचा हा संग्रह. माणसा-माणसातील, स्त्रीपुरुषांमधील विविध नाती, मानवी प्रवृत्ती आणि संस्कार यांचा तळाशी जाऊन घेतला जाणारा वेध आणि शोध हे पठारे यांच्या एकूण लेखनाचे वैशिष्ट्य; त्याची जाणीव या कथा वाचतानाही होते. या कथासंग्रहात १९७९ ते१९९७ या कालखंडातील ७ कथांचा समावेश केला आहे. नावीन्यपूर्ण विषय आणि मांडणी मधील कल्पकता ही या कथांची खास वैशिष्टय़े.
यातील "चोखोबांच्या पाठी" ही मला सर्वात जास्त आवडलेली कथा. कदम नावाचे संत चोखोबांवरती प्रेम असणारे गृहस्थ. त्यांनी त्यांचे आयुष्य चोखोबां साठीच समर्पित केलेले. चोखोबांवरती पुष्कळ कथा कादंबर्या त्यांनी प्रकाशित केलेल्या. अशाच एका पुस्तकाची नवीन आवृत्ती काढण्यासाठी त्यांना चोखोबा यांच्या आयुष्याशी संबंधित असलेल्या पंढरपुर आणि मंगळवेढा या शहरातील गोष्टींचे फोटो हवे असतात. त्या साठी ते एका माणसाला नेमतात. या माणसासोबत संत चोखोबा ही पंढरपूर ला जातात असा आशय धरून पुढे कथा लिहिलेली आहे.
ज्या लोकांना नवीन आणि वेगळं काही वाचायची उत्सुकता आहे, त्या लोकांसाठी पठारे यांची पुस्तक must read आहेत.