Summary of the Book
लेखक श्री .मोहन रणसिंग हे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत .त्यांचे जीवन तळाचा समाज जागृत होत होता त्या काळात घडले .किंबहुना मोहनसारख्या शेकडो कार्यकर्त्यांचा समाजाला जागे करण्यात हातभार लाभलेला आहे .ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजातील आहेत .त्यांचे बालपण बिकट परिस्थितीतून गेलेले आहे .ते त्यातून सावरून उभे राहिले .या समाजातून लहानाचे मोठे होताना त्यांच्या वाट्याला जे काही अनुभव आले ते त्यांनी या 'गावदाबी'च्या माध्यमातून सांगितलेले आहेत .ते विलक्षण वेधक व वाचनीय झालेले आहेत .त्यांची वर्णनशैली वास्तवदर्शी व वस्तुनिष्ठ आहे .त्यांनी लिहिलेला आयुष्याचा हा ऐवज इतका नाट्यपूर्ण आहे ,की प्रत्येक प्रसंग खुलून जातो .केव्हा विनोदी प्रसंगाने हसू येते ,तर त्यांचे कष्टमय जीवन पाहून हैराण व्हायला होते .यातील पात्रे म्हणजे त्यांचे आप्तस्वकीय ,गणगोत ,समाजबांधव ,शाळकरी मित्र ,गुरुजी ,सर ! ही सगळी त्यांच्या सभोवतालचीच मंडळी .पण कादंबरीकार कल्पनेने चितारू शकणार नाही इतकी ती व्यक्तीचित्रे लोकविलक्षण आहेत .त्यांच्या वर्तनाचा अर्थ लावताना हे लेखन म्हणजे मोठी कलाकृती वाटू लागते .मोहन यांनी आपल्या कुटुंबाची पार्श्वभूमी,आपला जन्म ,शाळा ,शाळेतील प्रेमप्रकरण, कुटुंबाचे संघर्षमय जगणे ,वाट्याला आलेले व्याप आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जातपंचायतीकडून वारंवार भोगावा लागलेला त्रास हे सगळे विस्ताराने मांडलेले आहे ते अतिशय हृदयस्पर्शी आहे .