Summary of the Book
असा हा स्थितप्रज्ञ किती शांत असतो? समुद्रासारखा शांत असतो. समुद्रासारखा शांत का? समुद्र तुडुंब भरलाय, असं आपण म्हणत नाही. विहीर तुडुंब भरलीय असं आपण म्हणतो. कारण विहिरीला मर्यादा आहे. त्या मर्यादेत पाणी येतं. काठोकाठ येतं.
आणखी आलं की, उफरंडून वाहू लागतं. तुडुंब भरणं हे डोळ्याला दिसतं, अनुभवाला येतं. समुद्र तुडुंब भरला म्हणजे काय? कितीही भरला तरी तो तुडुंबच भरलेला असतो. नद्या येतात, येतात, येतात. एवढी प्रचंड गंगा येते. अगदी गंगोत्रीपासून फिरत फिरत हृषिकेश, हरिद्वारे, काशी, प्रयाग करत करत तिथे आली. येतेच आहे, आणि येत राहिलीच आहे. समुद्राला त्याचं काय? अशा हजार गंगा आल्या, तो आहे तसा. तो मर्यादा सोडत नाही. समजा ह्या नद्या बंद झाल्या; तो आहे तसाच. नद्या आल्या काय अन् नद्या गेल्या काय? त्याची मर्यादा जी आहे ती तशीच आहे. तो तुडुंबच आहे असा तो शांत आहे.
शांती ह्याचा अर्थ, आल्यानं काही विकार नाही, गेल्यानं काही विकार नाही. आहे तसा तो निर्विकार, पण प्रसन्न. तो खेळतोय. स्वतःशीच तो खेळतोय. लाटांचा क्रीडा-विलास त्याचा सुरू आहे. लाटा जागच्या जागी येतात, उंच जातात, खाली येतात. लाटांचा खेळ चालू आहे. नद्या येतात-जातात, त्यांचा खेळ चालू आहे. त्या त्यांच्या राहतात. हा ह्याचा राहतो. दोघे एकमेकांचे असूनही, वेगळे दिसतात आणि वेगळे दिसूनही एकमेकांचे, एक असतात. हे शांतीचं जे काही अनुभवसौंदर्य आहे ते त्या स्थितप्रज्ञाच्या ठिकाणी असतं.