Summary of the Book
एखाद्या विशिष्ट संगीत नाटकावर आधारित कथामय नाट्यसंगीताचा प्रयोग पोतदारांनी पहिल्यांदा वसंतरावांच्या पुण्यतिथी निमित्ताने १९८४ साली सुरु केला. म्हणून त्यांना या संकल्पनेचे जनकच म्हटले पाहिजे. तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे जवळ जवळ ३५ वर्षे सातत्याने त्यांनी गाजलेल्या बऱ्याच संगीत नाटकांवर आधारित नाट्यप्रयोग सादर करून ही अभिनव संकल्पना राबविली. नाटकाच्या कथानकाबरोबर त्या संदर्भात आलेल्या गाण्यांचा आस्वाद नाट्यरसिकांना घेता येतो. त्यामुळे या कथामय नाट्यसंगीताच्या माध्यमाद्वारे संपूर्ण संगीत नाटक नाट्यरसिकांना कळते. त्यामध्ये नाट्यमयताही आलेली असून ही नाट्यसंकल्पना आता लोकप्रिय होत आहे. काही कलाकारांनी असे प्रयोग करण्यास सुरुवात केलेली आहे. अर्थातच याचे श्रेय निश्चितपणे जयराम पोतदारांना द्यावे लागेल.
आता ही अभिनव संगीत नाटके ग्रंथ रुपात प्रसिध्द होत आहेत. एकूण बारा संगीत नाटके, मराठी आणि हिंदी भाषेत एकाच वेळी उपलब्ध करून देण्याचासुद्धा हा पुस्तक क्षेत्रातला अभिनव प्रयोगच आहे.
'कथामय नाट्यसंगीत'; ह्या नाट्यसंहितेत अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे 'संगीत शाकुंतल' आणि 'सौभद्र' ह्या दोन गाजलेल्या नाट्यसंहितांचे कथामय संगीत रूप, गोविंद बल्लाळ देवल यांचे 'संगीत शारदा' , 'संशयकल्लोळ' ,ह्या दोन नाट्यसंहिता, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे 'संगीत मानापमान', 'विद्याहरण' , 'स्वयंवर' , 'द्रौपदी', 'सावित्री' ही पाच गाजलेली नाटके, राम गणेश गडकरी यांचे 'संगीत एकच प्याला' ही नाट्यसंहिता, विद्याधर गोखले यांचे 'संगीत सुवर्णतुला' आणि पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे 'संगीत कट्यार काळजात घुसली' ही नाटके प्रस्तुत नाट्यसंहितेत ग्रथित केलेली आहेत.