Summary of the Book
"कोडुगन्नावा" हा ज्ञानपीठ पुरस्कारविजेते मल्याळी कथाकार एम. टी. वासुदेवन नायर यांच्या कथासंग्रहाचा मराठी अनुवाद धनश्री हळबे यांनी केला आहे. रोजच्या व्यवहारातील घटनांचा माणसांच्या मनावर होणारा परिणाम, या घटनांचा कथेमागील व्यक्तिरेखांनी लावलेला अर्थ आणि या अर्थाचा व्यक्तिरेखेच्या जगण्याशी, एकूणच मानवी जीवनाशी असलेला अर्थ नायर यांच्या कथांमधून व्यक्त होतो.
व्यक्तिरेखेच्या वर्तमान आयुष्यात घडलेल्या एखाद्या प्रसंगापासून कथा सुरू होते आणि कथेचे निवेदन, काल-परवा घडलेल्या- घडून गेलेल्या भूतकाळाकडे वळते आणि मग कथेचे कथानक व्यक्तिरेखेच्या आयुष्यात बालपणीच्या घटनांकडे सरकू लागते. लगतच्या भूतकाळाकडून दूरच्या भूतकाळात, अगदी दूरच्या भूतकाळात, फार पूर्वी घडून गेलेल्या अनुभवांमुळे "त्या' व्यक्तिरेखेचे आयुष्य, जगणे कसे बदलत गेले, हे कथेतून समजते आणि मग कथा मुख्य व्यक्तिरेखेच्या वर्तमान जगण्याकडे येते.
भारतासारख्या देशात तंत्रज्ञानाने अत्याधुनिक झालेला मानवी समाज आणि आधुनिकतेचा स्पर्श न झालेली गावे, खेडी, व्यवसाय-शिक्षणाने आधुनिक झालेली; पण मनाने परंपराप्रिय, रूढीप्रिय असलेली "भारतीय मानसिकता', भारतीय समाजजीवनातील विरोधाभास नायर यांच्या कथांमधून व्यक्त होते. रोजच्या साध्या प्रसंगांमधून आणि अगदी सर्वसामान्य माणसांच्या जगण्यातून या कथा व्यापक होतात, याचा प्रत्यय हळबे यांच्या अनुवादातून येतो.