Summary of the Book
लाख्यांच्या कवितांची बाह्य लक्षणे म्हणजे- त्या अत्यंत साध्या वाटतात आणि त्यांत इंद्रियगम्य प्रतिमांची गर्दी दिसत नाही. आकारानेही त्या मोठी जागा व्यापणाऱ्या नाहीत. सारखे जागतिक वा देशी घटनांचे संदर्भ किंवा आजच्या जीवनशैलीतले , तपशील हे हि फारसे दिसत नाहीत. सांगीतिक लयही फारशी जाणवत नाही. थोडक्यात म्हणजे, दिखाऊ देखणेपणापासून लांबच राहणाऱ्या या कविता आहेत.
या कविता प्रचंड आशयघनतेचा प्रत्यय देणाऱ्या आहेत! त्यामुळेच कोणतीही कविता एका वाचनात पुरेशी पोचत नाही. पुन्हा व पुन्हापुन्हा वाचावी लागते. म्हटले तर एखाद्या व्यक्तिगत अनुभवापासून वा जगण्याच्या एखाद्या कंगोऱ्यातून ही कविता सुरु झालेली दिसते, पण , असा एखादा अनुभव वाचकात परावर्तित करणे हा तिचा हेतूच नसल्याचे लक्षात येते. ही कविता कोणत्याही विषिष्ठतेची न थांबता त्या त्या क्षणीचे पूर्ण जगणेच कवेत घेऊ पहाते. ही प्रक्रिया सामान्यतः वाचकाच्या सवयीची नसते. या अर्थाने, हि कविता सवयीच्या जगण्यावर तिच्या अमर्याद आशयाचा बुलडोझर फिरवते! साठलेल्या भूतकाळातून प्रतिक्रिया देणे हा या कवितांचा हेतूच नाही.
माणसाच्या जगण्यातल्या मूलभूत प्रश्नांच्या तत्त्वज्ञानात्मक-अध्यात्मिक आशयाच्या अशा या कविता आहेत. या कवितेतून बाहेर राहत असल्याने, त्यांच्या स्वभावाच्या म्हणाव्या अशा एकाच एक शैलीचा इथे अभाव आहे. अशा या कविता मराठीत अपवादात्मकच आहेत. सांस्कृतिक परिपक्वता आणणाऱ्या अशा या कविता आहेत. अनेक मळलेल्या वाटा सोडून चिंतनात्मकतेने आपल्या चोख वाटेने जाणारी हि खरी कविता आहे! मौल्यवान कविता आहे!