Summary of the Book
गजानन माद्यसवारहा नव्या उमेदीचा कवि आहे. बँकेंत नोकरी करूनही आपल्यातील कवीपण आणि कवीमन जपून आहे. ' अंधारातल्या वस्तीतील सूर्य' हा त्यांचा दुसरा कवितासंग्रह. त्यांची कविता ताल, सूर, लय आणि विचार यांची गुंफण करीत येते. त्यांचे मन गजलसदृश रचना गुणगुणत असते. गेयता हे त्यांच्या कवितेचे अंग आहे. गात गात लिहीणे हा त्यांचा स्वभाव आहे. जात, धर्म ह्यांच्याद्वारे होणारा माणसामाणसांतील भेदभाव त्यांना व्यर्थ वाटतो. धर्मांध लोक मेंदूत विष पेरतात. लोकशाहीमध्ये विकृतीचा बाजार मांडला जातोय. कष्ट उपसणारा शेतकरी दु: ख भोगतो. न्यायच न्यायाच्या प्रतीक्षेत आहे, याची त्यांना खंत वाटते. पंढरीच्या पांडुरंगबद्दल, संत तुकारामाबद्दल त्यांना आस आहे. कवीची वृत्ती सौंदर्यसक्त असली, तरी बहुतेक कविता विचार कविता आहेत. आपल्या दारात सूर्य फिरकावा अशी कवीची इच्छा आहे. बोलीभाषेतील गोडवाही यात आहे. वर्तमानातील समस्यांबाबत कवि सजग आहे. कवितेला लागणारे रसायन त्यांच्या कवितेत असल्याने या कवितासंग्रहातील कविता रसिकांना भावतील, असा मला विश्वास वाटतो.