Summary of the Book
प्रख्यात पत्रकार व उद्योजक राघव बहल यांनी ‘सुपरपॉवर’ या आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून चीन आणि भारताची तौलनिक परिस्थिती मांडली आहे. जगभरातले अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ आणि राजकारण्यांप्रमाणेच बहल यांनीही ‘भारत आणि चीन यांच्यामधील आर्थिक स्पर्धा कोण जिंकणार?’ हा प्रश्न केंद्रस्थानी ठेवून, दोन्ही देशांचा इतिहास, संस्कृती, सध्याची परिस्थिती, अर्थकारण, राजकीय धोरणं यांची तुलना करत या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलाय. हे करताना दोन्ही देशांचं सामर्थ्य, त्यांच्या कमकुवत बाजू आणि परस्परांच्या तुलनेत हे देश नेमके कुठे उभे आहेत, हे बहल मांडतात.
केवळ राजकारणी किंवा अर्थकारणीच नव्हे, तर सामान्य वाचकांसाठीही हे पुस्तक ‘आय ओपनर’ आहे. सर्वसामान्यांना चीन आज क्षणोक्षणी भेटतोय. मुलांच्या खेळण्यांपासून ते अद्ययावत इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंत चीनने आज भारतातल्या घराघरात प्रवेश केलाय. त्यामुळेच चीनविषयी भारतीयांना कुतूहल आहे. ते १९६२च्या युद्धातील पराभवापलिकडे जाणारं आहे. मुंबईचं शांघाय करण्याच्या घोषणा करून राजकीय नेत्यांनीही भारतीयांच्या मानसिकतेतच चीनला घट्ट रुजवण्याचं काम चोख बजावलंय. असं नेमकं चीनमध्ये आहे तरी काय, याची उत्कंठा शमवण्याची कामगिरी ‘सुपरपॉवर’ पुरेपूर करतं.