Bookbandhu Reviews (Omkar Bagal)
19 May 2025 05 50 PM
के कनेक्शन्स - प्रणव सखदेव
पुस्तक परीक्षण - ओंकार बागल
आपण एखादं रोपटं लावतो, त्याला रोज पाणी देतो, त्याला निसर्गाचा सूर्यप्रकाश मिळतो, ते हळूहळू वाढू लागतं. आपण कुंडीतल्या रोपट्याला उंदरा-मांजरांपासून वाचवतो, बाहेर कुठे लावलं असेल तर इतर कुणाकडून इजा होणार नाही याची काळजी घेतो. मग ते रोपटं आणखी वाढायला लागतं, बहरायला लागतं. कुंडी किंवा छोटीशी जागा त्याला अपुरी पडू लागते, तेव्हा आपण ते कुठल्यातरी मोठ्या जागी हलवतो आणि काही वर्षांनी ते झाड बनतं. आणखी काही वर्षांनी त्याचं एखाद्या भल्यामोठ्या वृक्षात रूपांतर होतं. हा प्रवास..त्या रोपट्याचा..रोपट्यापासून वृक्षात झालेल्या संक्रमणाचा. तो संक्रमणाचा काळ..हा काळ त्या रोपट्याने स्वतः जगलेला असतो. अनेक वर्षांचा कालावधी असल्याने त्या रोपट्याव्यतिरिक्त कुणाला हा काळ जाणवला असेल का?
आपणही जेव्हा बालवयापासून कुमारवयात आणि कुमारपासून तरुणवयात येत असतो तेव्हा कळत-नकळत संक्रमित होत असतो. होय, संक्रमितचं! आपण नुसतेच वाढत नसतो. वाढ होताना कित्येक जाणिवा घेऊन लांबत जात असतो. मात्र त्या जाणिवाही अपुऱ्याचं आणि ते वाढणंदेखील अपुरचं. अचानक कोणीतरी लांबचा काका, मामा येतो आणि म्हणतो, "अरे, किती मोठा झालास. चड्डीत असताना पाहिलं होतं तूला, आता थोराड मिशीवाला झालायस." बस्स..झर्रकन सर्व लहानपणापासून ते आतापर्यंतचा काळ डोळ्यांसमोर घोंगावू लागतो. कदाचित तेव्हा कुठेतरी जाणीव होते, मोठे होत असल्याची. बाल वयातून ते कुमार ते तरुण झाल्याची. या जाणिवा..संक्रमित होत असतानाच्या जाणिवा. खूप काही दडलंय या साऱ्यात.
या नेमक्या गोष्टीचा ठाव घेऊन लेखक प्रणव सखदेव यांनी ही कादंबरी लिहिली आहे. वयात होत असतानाच्या जाणिवा, हा या कादंबरीचा मूळ आशय आहे. आपण बऱ्याचदा अनेकांकडून एक वाक्य ऐकतो, "तेव्हा मी लहान होतो रे, त्या वयात कुठे नीट कळतं कुणाला?" हाच तर गाभा आहे या के कनेक्शन्सचा, ना धड कळतंय, न धड समजतंय. बस्स हलकं हलकं काहीतरी उमगतंयं. पण त्याचं काही कनेक्शन लागेना. कदाचित त्या वयात ते लावता येईना. हे वयचं असं अडनिड् आहे त्यामुळे बहुदा ताळमेळ लागेना. कादंबरीतील नायक कुमार याचसुद्धा कदाचित काहीसं असंच झालंय. लेखकांनी ही कादंबरी 'मोझाइक नॉव्हेल्स' या प्रकारात लिहिली आहे. एक एक मोती ओवून बनवलेला 'मोत्यांचा हारचं' जणू.
ही कादंबरी खरं तर नॉस्टॅल्जिया आहे, क्षणाक्षणाला लहानपणात घेऊन जाते. अर्धवट परिपक्व झालेल्या वयाची सारी चित्रे डोळ्यासमोर उभी करते. या कादंबरीत नुसतं बालपण चितारलेलं नाहीये, तर प्रत्येक पानासरशी एक संवेदना जागवलेली आहे. एक अशी सुप्त संवेदना जी आपण सर्वांनी आपल्या लहानपणी अनुभवली आहे, जगली आहे. कुमार वयात पुन्हा पुन्हा डोकावून, त्या साऱ्या भावना आठवून, साचेबंध करण्याचा हा खटाटोप निराळा आहे. कादंबरीचा विषय जितका रम्य, भावनिक आणि रंजक आहे तितकाच तो अंतरंगातील गूढ विश्वाचा आहे. एक असं विश्व जे कुमारवयात प्रत्येकाने स्वतः निर्माण केलं होतं. अचानक आपण मोठे होऊन बसलो आणि कुठल्यातरी कृत्रिम जगात वावरू लागलो. ही कादंबरी आपल्याला स्वतःच्या खऱ्या विश्वाशी पुन्हा एकदा भेट घालून देते. आपल्याला ओरडून सांगू पाहते, "हा खरा तू आहेस."
के कनेक्शन्स.. खरंच खूप कनेक्शन्सची ऊहापोह केली आहे यातून. माणसांची, जागांची, ठिकाणांची, प्रवासांची, वस्तूंची, खाद्यपदार्थांची, खेळणांची, भावनांची आणि जाणिवांची. यातली कनेक्शन्स वाचताना, आपल्याला आपली कनेक्शन्स आपोआप आठवू लागतात. आजच्या विशीतल्या आणि तिशीतल्या तरुणाईला अक्षरशः भारावून टाकणारी कादंबरी आहे ही. यातून विचारात घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 'काळ'. बोरकूट, बर्फाचा गोळा, सायकल, पतंग, लाल मातीचं मैदान, फ्रेंडशिप डे चे रिबन्स, गच्ची, नदीवरचा पूल, बाजार इ. गोष्टी म्हणजे त्यावेळचा काळ दर्शवतात. हा काळचं असतो जो कितीतरी बदल घडवत असतो. या गोष्टी पिढ्यांनुसार बदलत राहतील, त्यांची जागा दुसऱ्या कुठल्यातरी गोष्टींनी घेतलेली असेल; परंतू त्यांतील चेतना जिवंत राहील.
के कनेक्शन्स ही कादंबरी आणखी बऱ्याच गोष्टींवर भाष्य करत राहते. सामाजिकदृष्ट्या माणूसकी आणि बांधिलकी यावर पुरेपूर प्रकाश टाकते. जेव्हा घरांच्या भिंती एकमेकांना लागून होत्या तेव्हा माणसांतलं माणूसपण कशाप्रकारे जपलं जात होतं, हे कडबोळी मावशी आणि भाजीवाली अक्का यांच्या माध्यमातून समजून येतं. नव्वदीच्या दशकातील आर्थिक परिस्थितीचे केलेले विवरण हे एकप्रकारचे चिंतन आहे. चांगल्या, वाईट, नाजूक, बिकट आणि हलाखीच्या आर्थिक परिस्थितीचे वर्णन दिन्या, कुमार, मन्या या पात्रांद्वारे समजते आणि खूप काही सांगून जाते. आजोबांनी घालून दिलेला बचतीचा नियम आणि बाबांची अनावश्यक खर्च टाळण्याची शिकवण यांसारखे आयुष्याचे धडे वाचायला मिळतात. हिंदू, मुस्लिम यांतला फरकदेखील याच अजाण वयात आपल्यावर थोपवला जातो आणि आपला दृष्टीकोन व मानसिकता कशी बदलत जाते, हे यातून लक्षात यायला लागतं.
एखाद्या खाद्य पदार्थासोबत असलेलं कनेक्शन हेसुद्धा एक अबोल कनेक्शन आहे, असं लक्षात येतं. ही कादंबरी बऱ्याच दृष्टिकोनातून कुमारला त्याच्या कोवळ्या वयात भेटलेल्या माणसांची आणि कमी-अधिक अनुभवांची आहे. त्या वयात इतरांच्या निमित्ताने का होईना बरेचसे नाजूक प्रसंग आपल्या आयुष्यात येतात, आपल्याला त्यांबद्दल फारसं माहित नसलं तरी पुसटशी कल्पना असते. पण त्या स्थितीला, त्या घटनांना सामोरं कसं जायचं हे काही समजतं नाही, हे आइस्क्रीम अण्णा व मेघादीदीच्या कहाणीतून जाणवतं. कुमारच्या शाळेतील सहलीनंतर मुलामुलींच एकमेकांविषयी बदललेलं समीकरण म्हणजे पालवी फुटण्यासारखं आहे, असंच तर होत आलं आहे ना आपल्यासर्वांसोबत. शिवाय त्या वयात निसर्गाशी किती एकरूप असतो आपण, हे वाचायला मिळतं.
अशी ही अतिशय रंजक आणि तितक्याच प्रभावी वैशिष्ट्यपूर्ण धाटणीच्या कथा असलेली कादंबरी..एक नवी कोरी मोझाइक नॉवेल..म्हणजे के कनेक्शन्स.
-©ओंकार बागल
Insta ID - bookbandhu_reviews
9321409890
bookbandhureviews@gmail.com