Summary of the Book
ही आहे म. गांधींबद्दलच्या निबंधाची वही. यात एकंदर १२ निबंध आहेत. त्यातील नऊ निबंध हे 'आजच्या जीवनात गाधी विचारांची गरज' या विषयावरील आहेत, तर तीन निबंध हे 'भारत विरुद्ध इंडिया' या विषयावरील आहेत. विशेष म्हणजे हे सर्व निबंध मराठवाडा विद्यापीठातील पदवीधर विद्यार्थ्यांचे आहेत.
आजच्या जीवनात गांधी विचारांची नेमकी काय गरज आहे किंवा कशी याविषयी आजच्या तरुणाईने केलेले मुक्तचिंतन असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. लेखक तरुण आणि त्यांची अभिव्यक्तीही 'तरुण', त्यामुळे या निबंधांमध्ये गांधीविचारांची पुनर्आेळखच करून दिलेली आहे. पण त्यात या तरुणांची स्वत:ची भाषा आहे. कळकळ आणि तळमळ आहे.
अभ्यास, अनुभव, चिंतन या प्रगल्भ विचारांच्या चढत्या पायऱ्या असतात. हे तरुण पहिल्या पायरीपर्यंत पोहचण्याच्या तयारीत असलेले आहेत. त्यामुळे या पुस्तकातून त्यांचा भविष्यातील कल कुठल्या दिशेने राहील याची चुणूक पाहायला मिळते.