Summary of the Book
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय रेल्वेचा प्रवास असो की पर्यटनासाठी केलेला लांबचा प्रवास- सर्वासाठीच तो आठवणींचा ठेवा असतो. मुंबई- पुण्यासारख्या मोठय़ा स्टेशनांवरून अप आणि डाऊन गाडय़ांच्या उद्घोषणा ऐकल्यानंतर पुलंच्या याविषयीच्या अप्रतिम लेखाची आठवण होणारच. रेल्वे खात्यात प्रदीर्घ काळ काम केलेल्या विनायक रत्नपारखी यांचे ‘जंक्शन’ हे पुस्तक वाचल्यानंतर रेल्वेचे विश्व किती आगळेवेगळे आहे, हे लक्षात येते. लोकल असो की मेल, ती वेळेवर आली नाही की सर्वचजण रेल्वे खात्याला लाखोली वाहतात. पण ‘जंक्शन’ वाचल्यानंतर मात्र येथील कर्मचारी कोणत्या दिव्यांमधून जात असतात ते उमजते आणि मोटरमन, गार्ड, तिकीट तपासणीस यांच्याविषयी आपले मतपरिवर्तन झाल्याशिवाय राहात नाही. तिकीट कलेक्टर ते मेल एक्स्प्रेस ड्रायव्हर ही रत्नपारखी यांची कारकीर्द यात शब्दांकित झालेली असून, कडू-गोड आठवणींनी हा कालखंड भरलेला आहे.
टिटवाळ्याजवळ रेल्वेमार्गात अडकलेल्या एका गायीला वाचवण्यासाठी त्यांनी केलेला आटापिटा, ‘मुंबई बंद’च्या काळात लोकल पेटवून देण्यासाठी जमलेल्या जमावाला दाखवलेला हिसका, राष्ट्रपतीपदकासाठी शिफारस करण्यावरून झालेले राजकारण, त्यांना खोटय़ा केसमध्ये अडकविण्याचे वरिष्ठांनी केलेले प्रयत्न, नितीशकुमार रेल्वेमंत्री असताना त्यांच्यासमवेत झालेली बैठक.. ते ३१ जानेवारी २००४ रोजी डेक्कन क्वीनचा ड्रायव्हर म्हणून केलेला नोकरीचा शेवटचा दिवस.. हा सर्वच प्रवास खरोखरच वाचनीय झालेला आहे. आत्मस्तुती टाळून आयुष्यात जे जे अनुभवले ते रत्नपारखी यांनी प्रामाणिकपणे या पुस्तकात मांडले आहे. सावनी केळकर यांच्या वेधक लेखनशैलीमुळे हे पुस्तक ‘नॉनस्टॉप’ वाचावेसे वाटते. रेल्वेप्रवास करणाऱ्यांनी हे ‘जंक्शन’ टाळू च नये.